लहू चव्हाण
पाचगणी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने भिलार ग्रामपंचायतीच्या वतीने प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. देशभक्तीपर फलक आणि राष्ट्रध्वज अभिमानाने हात फडकवत चिंब पावसात भिजत, देशभक्तीपर घोषणा देत शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने भिलार ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने पहिल्या दिवशी येथील हिलरेंज माध्यमिक विद्यालय, हिलरेंज हायस्कूल, भिलार ग्रामपंचायत आणि केंद्र शाळा भिलार यांच्या वतीने प्रभातफेरीचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.
शालेय विद्यार्थी- विध्यार्थीनीं हातात देशभक्तीपर घोषणांचे फलक आणि राष्ट्रध्वज घेऊन ‘भारत आमुचा प्राण, तिरंगा आमची शान’, आझादी की शान तिरंगा, चलो हर घर लहराए तिरंगा’ अश्या देशभक्तीच्या जयघोषात हिलरेंज हायस्कूल पासून सुरु झालेली ही जनजागृती फेरी भिलार वाहनतळ येथून हनुमान मंदिराजवळ आली. याठिकाणी समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले
यावेळी भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, प्रवीण भिलारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे, हिलरेंज हायस्कुलचे प्राचार्य जतीन भिलारे, मुख्याध्यापक प्रकाश बेलोशे, मुख्याध्यापिका तेजस्विनी भिलारे, शशिकांत भिलारे, वैभव भिलारे, प्रकाश भिलारे ग्रामसेवक राजेंद्र चव्हाण, तसेच शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.