शिरूर : करडे (ता.शिरूर) येथील एमआयडीसी परिसरातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीचा तब्बल 3300 ब्रास मुरूम अनधिकृतपणे उत्खनन करून चोरी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी एमआयडीसी स्थापत्य विभागाचे उपअभियंता मिलिंद रामचंद्र कासार (वय 56,रा. मीतिलानगरी,पिंपळे सौदागर,पुणे) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यानुसार शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,16 मे रोजी दुपारच्या दरम्यान उपअभियंता मिलिंद कासार हे करडे एमआयडीसी येथे विविध कामांच्या पाहणीसाठी गेले असता,गट नंबर 115/अ,115/ब, 115/6 आणि 107 या एमआयडीसीच्या मालकीच्या जमिनींमधून अंदाजे 3300 ब्रास मुरूम अज्ञात व्यक्तीने जेसीबी व डंपरच्या सहाय्याने काढून नेल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर एमआयडीसी स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मुरूम चोरावर कारवाई व्हावी.यासाठी महसूल विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.मात्र,त्या मुरूम चोरीवर कारवाई होण्यास शिरूरच्या महसूल विभागाकडून उशीर होत होता.अखेर एमआयडीसी स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे निमोणेच्या मंडलाधिकाऱ्यांनी 23 मे रोजी संबंधित मुरूम चोरीचा पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर केला.त्यानंतर मंगळवारी (ता.27) शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात सुमारे 3300 ब्रास मुरूम चोरी केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करडे एमआयडीसीच्या मालकीच्या जमिनीतून चोरी झालेल्या मुरूमाची एकूण किंमत सुमारे 19 लाख 80 हजार आहे.तसेच मुरूम चोरीसाठी जेसीबी व डंपरचा वापर करण्यात आल्याचा संशय एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार शिवाजी भोते हे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.
या अवैध मुरूम उत्खनन प्रकरणामुळे महसूल व एमआयडीसी विभागात खळबळ उडाली असून,मुरूम चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे.या घटनेमुळे शासकीय जमिनीवरील उत्खननाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
“अशाच पद्धतीने खंडाळेमाथा (ता.शिरूर) येथे पुणे-अहिल्यानगर महामार्गालगत दोन्ही बाजूने मोठ्या डोंगरांचे उत्खनन करून सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे.या उत्खनावर शिरूर महसूल विभागाने पंचनामा करून दिखावू कारवाई केली आहे.अशी माहिती समोर येत आहे.मात्र,पुढे काय? असा प्रश्न पर्यावरण प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.”







