पुणे : महाराष्ट्रात मतदार यादीची विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रिया सुरू आहे. भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार सध्याच्या मतदार यादीतील नागरिकांनी आपले नाव तपासून आवश्यक असल्यास बदल किंवा दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मतदारांनी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. या अर्जावर मतदाराची स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. अर्ज भरून दिलेल्या मतदारांची नावे 24 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.

एका व्यक्तीचे नाव मतदार यादीत एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदवले जाणार नाही. त्यामुळे एखाद्या मतदाराचे नाव सध्याच्या यादीत दोन ठिकाणी असल्यास, त्याने आपल्या सध्याच्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणच्या मतदार यादीत नाव ठेवण्यासाठी गणना अर्ज भरावा. दुसऱ्या ठिकाणी अर्ज केल्यानंतर ‘Already Enrolled’ अशी नोंद केली जाईल आणि त्या ठिकाणी नाव समाविष्ट केले जाणार नाही.

ज्या पात्र नागरिकांचे नाव प्रारूप मतदार यादीत आलेले नसेल किंवा ज्यांना मतदार म्हणून नोंदणी करायची आहे, त्यांच्यासाठी 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावा व हरकत नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी नमुना क्रमांक 6 भरावा लागेल. मतदार यादीतील नावात दुरुस्ती करण्यासाठी नमुना 8, तर चुकीची नोंद वगळण्यासाठी नमुना 7 वापरता येईल.
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा दुरुस्ती करताना चुकीची माहिती किंवा खोटी घोषणा केल्यास संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. अशा व्यक्तीला एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होण्याची तरतूद आहे.
विशेष सखोल पुनरिक्षणानंतर अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतरही मतदार यादीत आवश्यक सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू राहणार असून नागरिकांना सतत अद्ययावत नोंदणीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.







