पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) प्रकरणावरून राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गुंड निलेश घायवळ सध्या विदेशात फरार आहे आणि पोलिसांकडून त्याच्याविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. मात्र, धंगेकर यांनी या प्रकरणात थेट चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयाकडे बोट दाखवले आहे.

धंगेकर यांनी असा आरोप केला की, निलेश घायवळ हा चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील पाटील नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता. त्या व्यक्तीचे मोबाईल आणि कॉल डिटेल्स तपासले तर तो व्यक्ती घायवळ सोबत किती वेळा बोलला आणि त्याने किती वेळा चंद्रकांत पाटील यांना निरोप दिला, याची सविस्तर माहिती समोर येईल.

या आरोपांवर प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील समीर पाटील यांनी धंगेकरांच्या आरोपांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. “रवींद्र धंगेकर यांचे आरोप हे अतिशय खोडसाळ आणि बिनबुडाचे आहेत. यामध्ये काहीच तथ्य नाही. एखाद्या माणसाला न ओळखता फक्त बोलायचं म्हणून ते बोलत आहेत. मी हे सर्व आरोप शंभर टक्के फेटाळतो,” असं समीर पाटील यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले, “मी कोणाचा दलाल नाही, कोणाचे निरोप द्यायला किंवा घ्यायला माझा काहीही संबंध नाही. धंगेकर यांच्या विरोधात मी मानहानीचा खटला दाखल करणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे धंगेकर कसबा मतदारसंघातील आमदार आहेत. खासदारकीच्या निवडणुकीत कोथरूडमधून जास्तीत जास्त मतदान त्यांच्या विरोधात झालं होतं. त्यामुळेच त्यांचा राग कोथरुडकरांवर आणि विशेषतः पाटलांवर आहे.”
समीर पाटील यांनी यावेळी स्वतःच्या विरोधातील आरोपांवरही भाष्य करताना सांगितलं की, “2000 ते 2025 या कालावधीत माझ्याविरोधात एकही गुन्हा दाखल नाही.”
दरम्यान, या प्रकरणावर मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारणा करण्यात आली. मात्र त्यांनी थेट उत्तर देणं टाळत फक्त “I Am Sorry” एवढंच म्हणत प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेचीही सध्या चांगलीच चर्चा होत असून, आगामी काळात चंद्रकांत पाटील या आरोपांवर सविस्तर स्पष्टीकरण देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







