पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावात आणि परिसरात प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सुरक्षेवर बोट ठेवत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आणि “सरकारला मराठा समाजासोबत कुस्ती खेळायची आहे का?” असा खोचक सवाल उपस्थित केला.

आंदोलनावर ठाम असल्याचे सांगत जरांगे यांनी सरकारमधील प्रमुख नेत्यांवर तसेच मराठा उपसमितीवर निशाणा साधला. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कामावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. मराठ्यांकडून अर्ज येत नसल्याचा दावा चुकीचा असल्याचे सांगत, प्रशासनाकडूनच अर्ज स्वीकारण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत किंवा ज्यांनी अर्ज केले आहेत, अशा सर्व नागरिकांनी अंतरवाली सराटी येथे येऊन आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

कुणबी नोंदी मिळालेल्यांना तत्काळ जात प्रमाणपत्रे दिली जावीत. तसेच जात प्रमाणपत्र पडताळणीची (व्हॅलिडिटी) प्रक्रिया त्वरित पूर्ण व्हावी.EWS प्रवर्गातून निवड होऊनही रखडलेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे मिळावीत. संबंधित जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी स्वतः अंतरवालीत येऊन यावर तोडगा काढावा या मागण्या आंदोलनात ठेवण्यात आल्या आहेत

जरांगे यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत मागण्यांची ठोस अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. तसेच प्रशासनाने निर्णय न घेतल्यास लाखो वाहनांसह मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला. मराठा तरुणांनी नैराश्यातून कोणतेही टोकाचे पाऊल न उचलता एकजुटीने या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.






