कोल्हापूर : स्वातंत्र्योत्तर भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ बहाल करण्याच्या मागणीवर आता न्यायालयाने ठोस भूमिका घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने केंद्र सरकारला 20 दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश देत 4 मे 2026 पूर्वी सकारात्मक भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तब्बल 74 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सन्मानाला न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या संदर्भात ‘कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशन’ने नोव्हेंबर 2025 मध्ये याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारच्या विलंबावर नाराजी व्यक्त करत इतक्या मोठ्या ऐतिहासिक कामगिरीकडे दुर्लक्ष होणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. सरकारच्या दिरंगाईमुळेच हा सन्मान इतकी वर्षे रखडल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले.
जाधव यांना योग्य सन्मान मिळावा यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी दीर्घकाळ संघर्ष केला आहे. विशेषतः त्यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. 2017 मध्ये पद्मविभूषणसाठी पाठवलेली शिफारस फाईल हरवल्याची बाब समोर आल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. राज्य सरकारकडून आश्वासन मिळूनही प्रत्यक्षात कार्यवाही न झाल्याने अखेर न्यायालयात धाव घेण्यात आली.
खाशाबा दादासाहेब जाधव हे भारतीय कुस्तीतील एक दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व होते. 15 जानेवारी 1926 रोजी सातारा जिल्ह्यातील गोलेश्वर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांकडूनच कुस्तीचे धडे घेत त्यांनी पुढे कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आपल्या खेळाला धार दिली.
1948 च्या लंडन ऑलिम्पिक 1948मध्ये अपयश आल्यानंतरही त्यांनी जिद्द सोडली नाही. 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिक 1952मध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. जर्मनी, कॅनडा आणि मेक्सिकोच्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत त्यांनी स्वतंत्र भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले.
दरम्यान, 14 ऑगस्ट 1984 रोजी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या योगदानाला योग्य तो सन्मान मिळावा, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. आता न्यायालयाच्या आदेशामुळे या मागणीला नवे बळ मिळाले असून, केंद्र सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





