आदित्य बोराटे –

पुणे : वालचंदनगर जंक्शन रस्त्याच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सामाजिक कार्यकर्ते शेखर काटे यांनी रस्त्याच्या कामातील विलंबाबाबत वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रस्त्याची दुरवस्था, धूळ आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काटे यांच्या माहितीनुसार, या रस्त्याच्या प्रश्नावर २७ डिसेंबर २०२५ रोजी कळंब येथील बळीराजा सांस्कृतिक भवनात बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर शासन आणि संबंधित कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी ५ जानेवारी २०२६ रोजी वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री यांच्या उपस्थितीत कंपनीने रस्त्याच्या कामासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिल्याचे सांगितले गेले.
मात्र, प्रत्यक्षात रस्त्याचे काम अद्याप सुरू झाले नसल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत माहिती घेतल्यानंतर संबंधित कंपनीने मोबदल्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती मिळाल्याचा दावा काटे यांनी केला आहे. हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने काम सुरू करण्यास अडचणी असल्याचे संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांकडून सांगितले जात असल्याचा त्यांचा दावा आहे.
दरम्यान, या विषयावर मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठकही झाल्याचे काटे यांनी सांगितले. त्या बैठकीनंतर काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून, कंपनीने मोबदल्याचा प्रश्न निकाली निघाल्याशिवाय काम सुरू करण्यास नकार दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
रस्त्याची दुरवस्था आणि साचलेल्या घाण पाण्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ आपण खड्ड्यात उतरून आंदोलन केल्याचे काटे यांनी सांगितले. संबंधित कंपनीने येत्या १५ दिवसांत हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा नागरिकांचा तीव्र रोष ओढवू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या प्रकरणातील आरोप आणि दाव्यांबाबत वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड किंवा संबंधित शासकीय यंत्रणेची अधिकृत भूमिका समजू शकलेली नाही. रस्त्याचे काम लवकर सुरू होऊन नागरिकांची गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.







