आदित्य बोराटे

पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या आषाढी वारीतील पालखी सोहळ्याचे दुसरे गोल रिंगण शनिवारी (दि. १८) इंदापूर येथील कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या मैदानावर भक्तिभाव, शिस्त आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडले. टाळ-मृदुंगाचा निनाद, विठ्ठलनामाचा अखंड गजर आणि मानाच्या अश्वांच्या वायुवेगाने झालेल्या दौडीने संपूर्ण इंदापूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

पहाटे निमगाव केतकी येथे नित्यपूजा व आरती झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ सकाळी ६ वाजता इंदापूरकडे प्रस्थान झाला. तरंगवाडी व गोकुळीचा ओढा येथे विसावा घेत पालखी सकाळी ११.३० च्या सुमारास रिंगणस्थळी दाखल झाली. नगारखाना आणि दिंड्यांच्या आगमनानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ तसेच ५० हून अधिक दिंड्यांनी रिंगणस्थळी प्रवेश केला. रथ मध्यभागी विराजमान झाल्यानंतर पताकाधारी, तुळसधारी महिला, विणेकरी, सेवेकरी तसेच पोलीस व प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रदक्षिणा पूर्ण केली.
रिंगण सोहळ्याचे प्रमुख आकर्षण मानाच्या अश्वांची दौड ठरली. परभणी जिल्ह्यातील पाथर्डी (बाभळगाव) येथील माई दिंडीचा मानाचा अश्व आणि सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मोहिते-पाटील यांच्या अश्वाने पालखीभोवती वायुवेगाने पाच प्रदक्षिणा घातल्या. अश्वांची दौड पूर्ण होताच मैदानात ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ आणि’ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. वारकऱ्यांनी अश्वांच्या पावलाखालची पवित्र माती कपाळी लावत भक्तिभाव व्यक्त केला.
रिंगणानंतर पालखीसमोर वारकरी, भाविक तसेच बंदोबस्तासाठी तैनात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फुगड्या खेळत भक्तीचा आनंद लुटला. जवळपास दोन तास चाललेल्या या सोहळ्यात प्रत्येक वारकरी विठ्ठलनामात तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पालखी रथ इंदापूर शहरात दाखल होताच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्ष भरत शहा,भाजप नेते प्रदीप गारटकर,उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, विरोधी पक्षनेते अनिल पवार, मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्यासह नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पालखीचे स्वागत केले. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांनी पालखी रथाचे सारथ्य करत रिंगणस्थळी आणले.
यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, सोहळाप्रमुख विक्रम महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे तसेच विश्वस्त गणेश मोरे, वैभव मोरे, दिलीप मोरे आदी उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अंकीता पाटील-ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि हजारो वारकरी या भक्तिमय सोहळ्याचे साक्षीदार झाले.
संत तुकाराम महाराज संस्थानच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर नगरपरिषद आणि प्रशासनाने रिंगणासाठी उत्कृष्ट नियोजन केले. ध्वनीक्षेपकाद्वारे वारकऱ्यांना वेळोवेळी सूचना देत संपूर्ण सोहळा शिस्तबद्धरीत्या पार पाडण्यात आला.
रिंगणानंतर पालखी रथ इंदापूर शहरातील आयटीआय परिसरातील पालखी तळावर मुक्कामी विसावला. इंदापूर, माढा, करमाळा तसेच पंचक्रोशीतील लाखो भाविकांनी संत तुकाराम महाराजांच्या चरणपादुकांचे दर्शन घेतले. इंदापूर येथील मुक्कामानंतर रविवारी (दि. १९) सकाळी पालखी सोहळा सराटी येथील पुढील मुक्कामासाठी प्रस्थान करणार आहे.







