आदित्य बोराटे
Indapur इंदापूर, ता. 18 : उजनी धरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनी खासगी कंपनीला देण्याच्या शासन निर्णयाविरोधात इंदापूरमध्ये आज धरणग्रस्त शेतकऱ्यांचा संताप उसळला. “जमीन आमची… हक्क आमचा…” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडत उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढला. Indapur

शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे इंदापूर शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. हातात फलक, बॅनर आणि घोषणाबाजी करत शेकडो धरणग्रस्त रस्त्यावर उतरले होते. शासनाने संपादित अतिरिक्त जमिनी खासगी कंपनीला देण्याचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. Indapur

मोर्चादरम्यान आंदोलकांनी अनेक गंभीर मागण्या शासनासमोर मांडल्या. संपादित झालेल्या अतिरिक्त जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत द्याव्यात, खासगी कंपनीसोबतचा करार रद्द करावा, धरणग्रस्तांना योग्य पुनर्वसन आणि प्रलंबित मोबदला तात्काळ द्यावा, तसेच हिंगणगाव आणि तरटगाव परिसरातील जमिनींची सुरू असलेली मोजणी त्वरित थांबवावी, अशा मागण्यांचा यात समावेश होता. Indapur
यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे यांनी शासनावर जोरदार टीका केली. “धरणासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या, पण आज त्याच जमिनी खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही. शासनाने तातडीने निर्णय मागे घेत शेतकऱ्यांना न्याय द्यावा,” असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, आंदोलकांनी तहसील प्रशासनाला निवेदन देत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. उजनी धरणग्रस्तांच्या या एल्गारामुळे इंदापूर तालुक्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.







