पुणे : पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजल्यापासून सुरु असलेलं बचावकार्य मध्यरात्री एक वाजता थांबवण्यात आलं. या ढीगाऱ्यात एकूण 23 जण अडकले होते अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर बचावमोहीम थांबवण्यात आली.

महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य इमारतीमधील शोधमोहीम आता पूर्ण झाली आहे. मात्र, इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अजूनही 1 व्यक्ती अडकली असून, तिचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या श्वान पथकाची मदत घेतली जात आहे.

धोकादायक आणि अस्थिर बनलेल्या इमारतीमुळे मदतकार्यात सुरुवातीला प्रचंड अडथळे येत होते. हा धोका टाळण्यासाठी 12 पोकलेन, जेसीबी आणि डंपरच्या मदतीने मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. त्यानंतर अत्याधुनिक डिमोलिशन मशीन्स मागवून इमारतीचा धोकादायक भाग हटवण्यात आला आणि एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली जवान आत दाखल झाले. चौथ्या दिवशी शोधमोहीम राबवताना अक्षय सावंत (35), सुनील कोरके (40), सन्नी माने (39), महेश कुंभार (33), नागेश गायकवाड (26), रणजीत पाटील (22) आणि राहुल गायकवाड (35) या सात जणांचे मृतदेह हाती लागले. या सर्वांना तातडीने वायसीएम (YCM) रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कशी घडली दुर्घटना?
मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर 8 जुलै रोजी दुपारी 1:30 च्या सुमारास कचऱ्याचा एक मोठा डोंगर कोसळला. या दुर्घटनेच्या वेळी इमारतीमध्ये 22 आणि बाहेर 1 असे एकूण 23 जण अडकले होते. यापैकी 5 जणांनी स्वतःची सुटका करून घेतली. घटनेची माहिती मिळताच भारतीय सैन्य दल, एनडीआरएफ, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीएचे अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे मोठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. पहिल्याच दिवशी 9 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले होते. मात्र, 9 जुलै रोजी बाहेर काढण्यात आलेल्या भावेश वाणी यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. आतापर्यंत या दुर्घटनेने एकूण 9 निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे.







