अहिल्यानगर : मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील कलाकेंद्र वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत आहेत. याचदरम्यान, नुकतीच अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड-मोहो येथील रेणुका कलाकेंद्रात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. चार गुंडांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन थेट स्टेजवर जात नृत्यांगणांवर हल्ला चढवत थिएटर मालकाकडे दरमहा एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत धमकी दिली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शुभम लोखंडे, सतीश टकले, नागेश रेडेकर (रा. आष्टी, जि. बीड) आणि अक्षय मोरे उर्फ चिंग्या (रा. जामखेड) हे चार आरोपी कोयते घेऊन रेणुका कलाकेंद्रात घुसले आणि थेट स्टेजवर जात थिएटर मालक अनिल पवार आणि त्यांचे पुत्र परशु व मोहित यांना दरमहा एक लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. खंडणीस नकार दिल्यानंतर आरोपींनी खुर्च्या, टेबल आणि नृत्यांगणांची स्कूटी फोडून मोठे नुकसान केले. हल्ल्याच्या वेळी मध्यस्थी करणाऱ्या ज्योती जाधव नावाच्या महिलेवरही हल्ला करण्यात आला.

फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपींपैकी शुभम लोखंडे याने ज्योती जाधव यांचा ब्लाऊज फाडून त्यांना धक्का दिला. तसेच इतर महिलांशी छेडछाड करून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याचा गंभीर आरोप आहे.
आरोपी शुभम लोखंडे यानेही प्रतिफिर्याद करत थिएटर मालकाचा मुलगा परशु पवार यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. जामखेड पोलिसांनी दोन्ही परस्परविरोधी तक्रारींवरून दोन्ही बाजूच्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, याप्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.
दरम्यान, अहिल्यानगरमध्ये घडलेल्या या कृत्यामुळे कलाकेंद्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.







