डॉ. अशोक बालगुडे

पुणे : हडपसरसह पूर्व हवेलीचा झपाट्याने झालेला विकास, अपुरे पर्यायी रस्ते, अतिक्रमणे, बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक नियमांची उघडपणे होणारी पायमल्ली यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांसह रुग्णवाहिकांनाही या कोंडीचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे अतिक्रमणांवर धडक कारवाई करून रस्ते आणि पदपथ मोकळे करण्याची मागणी नागरिक व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

हडपसर वाहतूक विभागाच्या वतीने शुक्रवारी (ता. 21) रस्ता सुरक्षा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत वाहतूक कोंडीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. काही मार्ग एकेरी करणे, शाळा-महाविद्यालय परिसर ‘नो हॉकर्स’ व ‘नो पार्किंग’ झोन करणे, तसेच बेशिस्त पार्किंगवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सतीश जगताप, सचिन शेवाळे, अभिजित कदम, संतोष खरात, विशाल गुजर आदी उपस्थित होते.

हडपसर प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रशांत तुपे म्हणाले, “चुकीच्या गोष्टीला कोणीही पाठीशी घालू नये. रस्ता वाहतुकीसाठी आणि पदपथ पादचाऱ्यांसाठी आहेत. ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ठोस कारवाई आवश्यक आहे. शाळा-महाविद्यालय परिसर ‘नो हॉकर्स’ आणि ‘नो पार्किंग’ झोन करावा. स्कूल बसेस रस्त्यावर उभ्या करण्याऐवजी शाळांच्या आवारात त्यांची व्यवस्था करावी.” हडपसर भाजी मंडई व क्षेत्रीय कार्यालयाच्या जागेवर मेट्रो स्थानक, मॉल, भाजी मंडई आणि क्षेत्रीय कार्यालयाचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिवसातून तीन वेळा अतिक्रमण कारवाई
महापालिकेचे सहायक आयुक्त कुणालकुमार धुमाळ यांनी अतिक्रमण विभागाकडे मनुष्यबळ आणि वाहनांची कमतरता असल्याचे मान्य केले. मात्र उपलब्ध साधनसामग्रीच्या माध्यमातून दिवसातून तीन वेळा अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “अतिक्रमण कारवाईत कोणाचाही मुलाहिजा किंवा दबाव सहन केला जाणार नाही. कारवाईची माहिती आधीच अतिक्रमणधारकांना देणाऱ्या चालकाची बदली करण्यात आली आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल,” असा इशाराही धुमाळ यांनी दिला.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईची मागणी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष ईशान तुपे यांनी हडपसरचा विकास वाहतूक नियोजनापेक्षा अधिक वेगाने झाल्याचे सांगितले. नो-एंट्रीतून व विरुद्ध दिशेने धावणारी वाहने, लक्झरी बसेस, रिक्षा, दुचाकी आणि स्कूल बसेस यांच्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक केराप्पा माने यांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रिक्षा, दुचाकी, नो-एंट्रीतून येणारी वाहने, ट्रिपल सीट आणि परवान्याविना धावणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू असल्याचे सांगितले. बेशिस्त रिक्षा जप्त करण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे.
मनपाचे माजी स्वीकृत सदस्य संजय शिंदे यांनी ससाणेनगरमधून बारा वाड्यांकडे जाणाऱ्या एकमेव रस्त्यावरील अतिक्रमणांचा मुद्दा उपस्थित केला. सकाळ-संध्याकाळ वाहने तासनतास अडकून पडत असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि रुग्णवाहिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तर अॅड. राहुल झेंडे यांनी लक्ष्मी कॉलनी ते कवडीपाट टोलनाका मार्गावरील खड्डे, रस्त्यावरील पार्किंग आणि हॉटेल्सच्या अतिक्रमणांचा मुद्दा उपस्थित केला. हॉटेल्सच्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. संबंधितांवर वाहतूक आणि अतिक्रमण विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, वाहतूक कोंडी ही केवळ वाहनांची समस्या नसून शहर नियोजनाच्या अपयशाचे लक्षण बनली आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याबरोबरच पदपथ, पार्किंग, स्कूल बस आणि सार्वजनिक वाहतुकीचे शिस्तबद्ध नियोजन करणे गरजेचे आहे. काही दिवसांची कारवाई नको, तर सातत्यपूर्ण धडक मोहीम राबविल्यासच हडपसरची वाहतूक कोंडी नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.







