पुणे : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 2019 मध्ये सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 3.68 लाख कोटी रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. मात्र या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना आता केंद्र सरकारने चांगलाच दणका दिला आहे. अपात्र लाभार्थ्यांकडून केंद्र सरकारने 416 कोटी रुपयांची वसुली केली असल्याची माहिती कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे?
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये रक्कम दिली जाते. ही रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत या योजनेच्या अंतर्गत एकोणिसाव्या हप्त्याचे वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान या योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यावर कारवाई करण्याचा धडाका केंद्र सरकारकडून लावण्यात आला आहे. शासनाने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आधार प्रमाणीकरण, जमीन नोंदीची पडताळणी आणि ई केवायसी अनिवार्य केली आहे.अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे निधी वितरण थांबवण्यात आले आहे त्यानुसार आतापर्यंत अशा शेतकऱ्यांकडून 416 कोटी रुपये परत घेण्यात आले आहेत.