पुणे : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत ई बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आली आहे.परिवहन विभागाचे मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी मंत्रिमंडळासमोर ई बाईक्सचा प्रस्ताव ठेवला होता.त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ई बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आली आहे.
राज्यात प्रामुख्याने सिंगल प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. रिक्षा किंवा टॅक्सीकरीता भाडे द्यावे लागत होते, ते न देता आता ई बाईक टॅक्सीच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांना ई बाईकचा प्रवास कुठेही करता येणार आहे. या बाईक टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा आवश्यक असणार आहे. बाईक स्वाराच्या पाठी बसणाऱ्याला सुद्धा हेल्मेट बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर या बाईकच्या नोंदणी क्रमांकाची पाटी पिवळ्या रंगाची असणार असून दुचाकीसाठी विशिष्ट रंग ठरविण्यात येणार आहे.महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगली नियमावली सरकारने बनवलेली आहे.सरकारच्या ई बाईक्सचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे.
दरम्यान ई रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दहा हजार अनुदान द्यायचा प्रयत्न असून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातील, असे सांगतानाच इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ई बाईक पर्याय आणला जात असल्याचे परिवहन विभागाचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट सांगितले आहे.तसेच केवळ इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीच धावणार असल्याचे सांगून पेट्रोल बाईक टॅक्सीला परवानगी मिळणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.