न्हावरे : शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथील संभाजी, अजित आणि आलेगाव पागा विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांकडून गंभीर आरोप होत असतानाच, उपलब्ध लेखापरीक्षण अहवालातील ‘सामान्य शेरे व दोष’ यामुळे संस्थांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सभासद नोंदी, कर्जवाटप व वसुली, निधीची गुंतवणूक, मालमत्ता नोंदी तसेच संगणकीय कामकाजासह सुमारे २० बाबींवर लेखापरीक्षणात त्रुटी व सुधारणा करण्याच्या सूचना नोंदविण्यात आल्या आहेत.

आलेगाव पागा येथील सोसायटीच्या कर्जवाटप प्रकरणात शेतकरी माय-लेक अशोक सुदाम वाघचौरे व लता सुदाम वाघचौरे यांच्या सभासदत्व, इकरार व कर्जप्रकरणावरून यापूर्वीच वाद निर्माण झाला आहे. जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश दिल्यानंतर आता लेखापरीक्षणातील निरीक्षणांमुळे संस्थांच्या एकूण कारभाराच्या सखोल तपासणीची मागणी होत आहे.

कर्जवाटप,सभासद नोंदींवर आक्षेप

लेखापरीक्षण अहवालात प्रत्येक कर्जवाटपातून शेअर्सची कपात न करणे, व्याजाची योग्य आकारणी न करणे, गंगाजळी व इतर निधीची नियमानुसार गुंतवणूक न करणे, मालमत्तेवर घसारा न आकारणे आदी बाबींवर सूचना करण्यात आल्या आहेत. सभासदांच्या वारस नोंदी अद्ययावत ठेवणे, सहीचे स्पेसिमेन कार्ड दप्तरात ठेवणे, कर्ज खात्यातील बाकीची योग्य नोंद करणे आणि सक्रिय-अक्रियाशील सभासद यादी अद्ययावत करण्याबाबतही निर्देश आहेत.
तसेच कॅशबुक व इतर रजिस्टरची योग्य नोंद, सभासदांना भाग दाखले देणे, रोकड व मालमत्तेचा विमा उतरविणे, स्थावर-जंगम मालमत्ता रजिस्टर अद्ययावत ठेवणे आणि संगणकीय कामकाजाचे ईडीपी लेखापरीक्षण करण्याची सूचनाही अहवालात आहे.
संचालकांकडील थकबाकीचा मुद्दाही ऐरणीवर
उपलब्ध अहवालानुसार काही संचालकांकडेही येणे/थकबाकी असल्याची नोंद आहे. त्याबाबत संस्थेने केलेल्या कार्यवाहीची माहिती दप्तरात ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य सभासद आणि संचालकांकडील कर्जवसुलीसाठी समान निकष वापरले जातात का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, शेतकरी बाळासाहेब वाघचौरे यांनी तीनही सोसायट्यांच्या कारभाराबाबत गंभीर आरोप करून त्रुटी निदर्शनास येऊनही ठोस कारवाई होत नसल्याचा दावा केला आहे. मात्र, लेखापरीक्षणातील निरीक्षणांवरून आपोआप गैरव्यवहार सिद्ध होत नसून, आरोपांची सत्यता निश्चित करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाकडून स्वतंत्र चौकशी आवश्यक आहे.
सहकार विभागाच्या भूमिकेकडे लक्ष
कर्जमंजुरी व वाटप, सभासदत्व, सातबाऱ्यावरील बोजा, थकबाकी वसुली, संचालकांकडील थकबाकी, संस्थेचे ठराव आणि लेखापरीक्षणातील आक्षेपांवर झालेली कार्यवाही यांची कागदपत्रांसह तपासणी झाल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे लेखापरीक्षणातील त्रुटींवर काय कार्यवाही होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.







