पुणे : पुणे पोलीस भरतीतील बनावट कुराश प्रमाणपत्रांच्या प्रकरणाचा तपास आता राज्यभर पोहोचला आहे. महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश विठ्ठल नागर आणि सचिव शिवाजी जयवंत साळुंखे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून कोल्हापूर कनेक्शन समोर आल्यानंतर ऋती धैर्यशील पुनगावकर आणि धैर्यशील संभाजीराव पुनगावकर या दाम्पत्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, २०१६ ते २०२६ या दहा वर्षांच्या कालावधीत एक हजारांहून अधिक बनावट क्रीडा प्रमाणपत्रे वितरित करण्यात आल्याचा संशय आहे. प्रत्यक्षात कोणत्याही क्रीडा स्पर्धेत सहभागी न झालेल्या उमेदवारांना खेळाडू म्हणून दाखवून ही प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रमाणपत्रांसाठी उमेदवारांकडून ५० हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत पैसे घेतल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

पुणे पोलीस भरतीतील तपासादरम्यान अशा प्रमाणपत्रांच्या आधारे १९ उमेदवारांनी नोकरी मिळवल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी १० उमेदवार प्रशिक्षणासाठीही गेले होते. यानंतर तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली असून, राज्यातील इतर आस्थापनांमध्येही अशाच प्रकारे बनावट कुराश प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवण्यात आली आहे का, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यभरातील एकूण ७१ जणांची कुराश प्रमाणपत्रांच्या आधारे नियुक्ती झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सर्व उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. या ७१ जणांपैकी नेमक्या किती जणांनी बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून नोकरी मिळवली, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, कोल्हापूरमधील पुनगावकर दाम्पत्याने मूळ आरोपींना मदत करताना काही कागदपत्रे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणातील अकॅडमीच्या माध्यमातून बनावट प्रमाणपत्रांचे जाळे नेमके किती दूरपर्यंत पसरले आहे, याचाही तपास सुरू आहे.
पुणे पोलीस भरतीतून समोर आलेले हे प्रकरण आता केवळ काही उमेदवारांपुरते मर्यादित राहिलेले नाही. राज्यभर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून ७१ जणांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग किंवा बनावट प्रमाणपत्रांचा वापर समोर येतो, हे पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.






