पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बऱ्याच काळापासून तो राष्ट्रीय संघाबाहेर होता. शांत स्वभाव आणि उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर त्याने भारतीय क्रिकेटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.आता त्याने सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे याने संघाचे नेतृत्व अतिशय सक्षमपणे सांभाळले. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ जिंकली होती. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही प्रकारांत तो भारताचा मुख्य आधारस्तंभ राहिला आहे.

अजिंक्य रहाणेची क्रिकेट कारकीर्द:
कसोटी: 85 सामने
एकदिवसीय (ODI): 90 सामने
टी-20: 20 सामने
आयपीएल (IPL): 6 वेगवेगळ्या फ्रँचायझींकडून 212 सामने
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अजिंक्यने निवृत्तीची माहिती दिली. “प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात आणि शेवट असतो. मी फलंदाजीत जसा टायमिंगला महत्त्व देतो, तशीच निवृत्ती जाहीर करण्याची ही योग्य वेळ आहे,” असे तो म्हणाला.
डोंबिवलीहून लहाणपणी सुरू केलेल्या प्रवासाची आठवण काढताना तो भावूक झाला. देशासाठी खेळणे हेच त्याचे सर्वात मोठे स्वप्न होते. “मी नेहमी संघाला स्वतःपेक्षा पुढे ठेवले आणि प्रामाणिकपणे खेळलो. First Class क्रिकेटपासून आजपर्यंत भारतीय क्रिकेटच्या या 20 वर्षांच्या प्रवासाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
भारतासाठी खेळण्याचा अध्याय संपला असला तरी क्रिकेटशी असलेले नाते कायम राहील, असे त्याने स्पष्ट केले. आगामी काळात नव्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपले अनुभव शेअर करण्यासाठी तो उत्सुक आहे.
शेवटी, त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA), सर्व सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, कुटुंब आणि चाहत्यांचे मनापासून आभार मानले. त्याच्या या निर्णयानंतर जगभरातील चाहत्यांकडून त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.







