पहलगाम : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. या कठीण परिस्थितीमध्ये जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आता एअर इंडियाने मोठा दिलासा दिला आहे.काश्मीरमध्ये अडकलेल्या एखाद्या प्रवाशाला जर आपली फ्लाइट रीशेड्यूल करायची असेल तर त्यावर कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही, तसेच ज्या प्रवाशांना आपलं विमान तिकीट रद्द करायचं असेल तर त्यांना पूर्ण रिफंड दिला जाईल, त्यावर कोणताही चार्ज आकारला जाणार नाही, असं एअर इंडियानं म्हटलं आहे त्यामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी एअर इंडियाची ही विशेष सवलत 30 एप्रिल 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. श्रीनगरवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व फ्लाइटसाठी ही सुविधा देण्यात आली आहे. श्रीनगरमध्ये अडकलेल्या प्रवाशांना दिलासा मिळावा, त्यांची मदत व्हावी या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान प्रवाशांच्या सुविधेसाठी एअर इंडिया कडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. 011-69329333 011-69329999
या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे.