पुणे : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्यामुळे संतप्त झाले आहेत.जरांगे पाटील यांनी आता पंढरपूर येथील सभेत अत्यंत जहाल वक्तव्य केले आहे.
सरकार माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे. “मी जर जीवघेणे उपोषण करू शकतो, तर जीवही घेऊ शकतो आणि सूड घेतल्याशिवाय राहणार नाही असे जरांगे -पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांशी बोलताना आरोप केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरी कुणबी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, असा टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले की, सरकार माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे. “मी जर जीवघेणे उपोषण करू शकतो, तर जीवही घेऊ शकतो आणि सूड घेतल्याशिवाय राहणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच धाराशिवपासून आपला पोलिस बंदोबस्त हटवून आपल्यावर हल्ल्याचा डाव आखल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

मराठा समाजाशी संवाद साधण्यासाठी जरांगे पाटील यांनी सोलापूर, तुळजापूर आणि पंढरपूरचा दौरा केला. रविवारी आटपाडी येथे त्यांची जाहीर सभा पार पडली. यानंतर सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ, वाळवा तालुक्यातील बोरगाव आणि कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्र येथे त्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाल्याने संपूर्ण मराठा समाजात तीव्र नाराजीची लाट पसरली आहे. बावनकुळे यांच्या एका चुकीमुळे सरकार अडचणीत आले असून, मंत्र्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे अधिकार राहिलेले नाहीत, असा घणाघात त्यांनी केला. या दौऱ्यामुळे आणि जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.







