पुणे : 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या एका जुन्या वादाप्रकरणी ठाकरेंच्या अडचणीत भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांच्या मानहानी प्रकरणात कल्याण न्यायालयाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना समन्स बजावले आहे. त्यानुसार आता त्यांना 5 ऑगस्ट रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

2009 मधील कल्याण लोकसभा मतदारसंघात आनंद परांजपे विरुद्ध वसंत डावखरे अशी लढत होती. परांजपे यांच्या प्रचारासाठी डोंबिवलीत आयोजित सभेत तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी एक व्हिडिओ सार्वजनिकरीत्या दाखवला होता.या व्हिडिओत डावखरे आपल्या कार्यकर्त्यांना पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची तमा न बाळगता निवडणूक जिंकण्याचे आवाहन करताना दिसले होते. मात्र, हा व्हिडिओ बनावट (मॉर्फ्ड) असून माझी बदनामी करण्यासाठी एडिट करून वापरल्याचा दावा वसंत डावखरे यांनी केला होता.
मात्र शिवसेनेने हा व्हिडिओ खरा असल्याचा दावा केला होता. त्यामुळे याविरोधात डावखरे यांनी थेट न्यायालयात दाद मागत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.
या प्रकरणी तक्रारदार वसंत डावखरे यांचे निधन झालेले आहे. त्यामुळे तक्रारदाराच्या अनुपस्थितीत आता हे प्रकरण कसे पुढे जाणार, याविषयी कायदेशीर वर्तुळात उत्सुकता आहे.
तसेच, न्यायालयाच्या या समन्सनंतर उद्धव ठाकरे 5 ऑगस्ट रोजी स्वत: न्यायालयात हजर राहणार की वकिलांमार्फत आपली बाजू मांडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. डावखरे कुटुंबाची यावरील पुढील भूमिका काय असणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







