Pune News : जुन्नर, (पुणे) : राज्यात वाढत्या तापमानाचा पारा आता जीवघेणा ठरू लागला आहे. जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे शेतात काम करत असताना उष्माघाताचा तडाखा बसून रुपाली भाऊ गाडगे (वय ४०) या महिला शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. उन्हाच्या तीव्रतेमुळे तालुक्यात मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. Pune News

रुपाली गाडगे या गेल्या दोन दिवसांपासून आपल्या शेतात कडक उन्हात खुरपणीचे काम करत होत्या. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास काम करत असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. वाढत्या उष्णतेमुळे त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. Pune News
अस्वस्थ वाटू लागल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने निमगाव सावा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक तपासणीत त्यांचा रक्तदाब (बीपी) अत्यंत कमी झाल्याचे समोर आले. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केल्यावर त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. मात्र, पुढील तपासणीसाठी डायग्नोस्टिक केंद्राकडे जात असताना वाहनात बसण्यापूर्वीच त्यांना तीव्र चक्कर आली आणि त्या बेशुद्ध पडल्या. दुर्दैवाने, उपचाराला प्रतिसाद मिळण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. Pune News
रुपाली गाडगे यांच्या पश्चात पती आणि तीन मुले असा परिवार आहे. घरातील कर्त्या महिलेचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने गाडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निमगाव सावा आणि परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून, कडक उन्हात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित महिला शेतात काम करीत असताना चक्कर येऊन पडली. मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. Pune News
प्रशासनाचे आवाहन
सध्या दुपारच्या वेळी तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे जात असल्याने नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत शेतात काम करणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि डोक्याला रुमाल किंवा टोपीचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. Pune News







