Mumbai News : मुंबई, : दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा अवघ्या १२ तासांच्या अंतरात मृत्यू झाला. बिर्याणीची मेजवाणी केल्यानंतर कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबीयांची प्रकृती अचानक बिघडल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

शनिवारी रात्री अब्दुल्ला कादर (४०), पत्नी नसरीन (३५), मुली आयेशा (१६) आणि झैनब (१३) हे नातेवाईकांसह जेवणासाठी एकत्र आले होते. बिर्याणी खाल्ल्यानंतर घरी परतल्यानंतर रात्री उशिरा त्यांनी कलिंगड खाल्ले. मात्र पहाटेच उलट्या, अतिसार आणि तीव्र अशक्तपणा जाणवू लागला. काही वेळातच चौघांची प्रकृती गंभीर झाली.
शेजाऱ्यांनी तत्काळ डॉक्टरांना बोलावले. प्राथमिक उपचारानंतर सर्वांना जेजे रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सर्वप्रथम लहान मुलगी झैनबचा सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर आई नसरीन आणि मोठी मुलगी आयेशा यांचाही मृत्यू झाला. रात्री उशिरा अब्दुल्ला कादर यांनीही अखेरचा श्वास घेतला.
उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, चौघांचीही अवस्था अत्यंत गंभीर होती. सतत उलट्या व अतिसारामुळे तीव्र निर्जलीकरण (डिहायड्रेशन) झाले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अब्दुल्ला यांनी मृत्यूपूर्वी रात्रीच्या जेवणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
तज्ज्ञांच्या मते, कलिंगडासारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांमध्ये भेसळ किंवा जिवाणू संसर्ग असल्यास विषबाधा होऊ शकते. साल्मोनेला संसर्ग किंवा लिस्टेरियोसिस सारख्या जीवाणूंमुळे अशी लक्षणे दिसू शकतात. दूषित अन्नामुळे अल्पावधीत गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. घरातून उरलेले कलिंगड आणि इतर अन्नाचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तसेच शवविच्छेदनातून घेतलेले नमुने (व्हिसेरा) रासायनिक विश्लेषणासाठी पाठवले असून फॉरेन्सिक व अन्न विभाग संयुक्तपणे तपास करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे अन्न सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अंतिम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.





