पुणे: इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवातीपासूनच तांत्रिक अडचणींमुळे झालेल्या विलंबाचा परिणाम प्रत्यक्ष प्रवेशांवरही दिसून येत आहे. पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी सोमवारी (ता. ८ जुलै) सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदत असताना, रविवारी (ता. ७ जुलै) सायंकाळी सात वाजेपर्यंत केवळ सुमारे ६० टक्के विद्यार्थ्यांनीच आपला प्रवेश निश्चित केल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

यंदा राज्य मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर केला होता. त्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियाही वेळेत पूर्ण होईल, अशी सर्वसामान्य अपेक्षा होती. मात्र यंदा राज्यभर प्रथमच संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतल्यामुळे विविध तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला अडथळे आले.
शेवटी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने २८ जून रोजी पहिल्या फेरीची निवडयादी प्रसिद्ध केली. या फेरीत एकूण ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून त्यापैकी तब्बल ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. मात्र, रविवारी सायंकाळी सातपर्यंत फक्त ३ लाख ८२ हजार १५४ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे. यावरून पहिल्या फेरीतील ६० टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश पूर्ण केल्याचे स्पष्ट होते.
राज्यभरात एकूण ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २१ लाख २३ हजार ७२० जागा उपलब्ध आहेत. या प्रवेश प्रक्रियेसाठी १३ लाख ६६ हजार ६३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत राखीव जागा व केंद्रीभूत प्रवेश मिळून एकूण ४ लाख ५७ हजार ३९ विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र ठरले आहेत. यामध्ये ७४ हजार ८८५ विद्यार्थी कोट्यातून प्रवेश घेतल्याची नोंद आहे.
पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी मुदत सोमवारी सायंकाळी संपल्यानंतर दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.







