संतोष पवार

पुणे : राज्यात इयत्ता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने जोडण्याची योजना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा अपेक्षित उद्देश साध्य न झाल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले असून, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ आणि त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्याचे निर्देश आता देण्यात आले आहेत. शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
शिक्षण शिक्षणाचे साहित्य त्यांचे सार्वत्रिकिकरण, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे, दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम, मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसणे याचा विचार करून शैक्षणिक वर्ष २०२३-२४पासून पाठ्यपुस्तकांत कोरी पाने समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा विद्यार्थ्यांकडून शिकवलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही.
सदर योजनेचा उद्देश हा दप्तराचे ओझे कमी करणे असा होता, परंतु विद्यार्थी पुस्तके आणि वह्या घेऊन येत असल्याचे, तसेच कोऱ्या पानांचा शैक्षणिक नोंदींसाठी वापर होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे योजनेचा अपेक्षित उद्देश फारशा प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आले नसल्याची बाब बालभारतीच्या संचालकांनी निदर्शनास आणून दिली. या अनुषंगाने ८ मार्च २०२३ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करून पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने समाविष्ट करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. आता शैक्षणिक वर्ष २०२५-२६ आणि त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्यात यावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.







