सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात (Satara News) सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिग्नलमध्ये छेडछाड करून (Karad News) रेल्वे थांबवण्यात आली आणि त्यानंतर प्रवाशांचे मोबाईल व दागिने लुटण्यात आले. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी सह्याद्री एक्सप्रेस मध्यरात्री शेणोली स्टेशनजवळ आली असता सिग्नल अचानक बंद पडला. प्राथमिक माहितीनुसार, संशयितांनी मुद्दाम सिग्नलमध्ये बिघाड करून रेल्वे थांबवली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रेल्वे थांबताच अज्ञात दरोडेखोरांनी डब्यांमध्ये प्रवेश केला आणि प्रवाशांकडील मोबाईल फोन तसेच सोने लुटले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच मिरज लोहमार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
या घटनेमुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रेल्वेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, अशा प्रकारची घटना कशी घडली याचा सखोल तपास सुरू आहे.







