MPSC Exam New Changes Maharashtra: राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने याबाबत नुकतीच अधिकृत सूचना जाहीर केली आहे. या बदलांनुसार (MPSC Exam New Rules) आता प्रत्येक प्रश्नासाठी उमेदवारांना चारऐवजी पाच पर्याय दिले जाणार आहेत. यापैकी किमान एका पर्यायाचे वर्तुळ रंगविणे उमेदवारांसाठी बंधनकारक असणार आहे. तसे न केल्यास त्या प्रश्नासाठी 25 टक्के गुण कापले जाणार आहेत. हे सर्व बदल 1 मार्च 2026 नंतर होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षांपासून लागू होणार आहेत. (Breaking News)

आयोगाच्या सूचनेनुसार आता उत्तरपत्रिका दोन भागांमध्ये विभागलेली असणार आहे. भाग 1 मध्ये केवळ प्रश्नांची उत्तरे नोंदवायची असतील, तर भाग 2 मध्ये उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक आणि उमेदवाराची स्वाक्षरी असा तपशील असणार आहे. परीक्षा संपल्यानंतर पर्यवेक्षकांकडून हे दोन्ही भाग वेगळे केले जाणार आहेत. यामुळे उत्तरपत्रिकेच्या मूल्यमापनात गोपनीयता राखली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
नव्या पद्धतीनुसार प्रत्येक प्रश्नासाठी चार संभाव्य उत्तरे आणि एक अतिरिक्त पर्याय असा एकूण पाच पर्याय असतील. जर उमेदवाराला दिलेल्या चार पर्यायांपैकी कोणतेही उत्तर योग्य वाटत नसेल, तर पाचव्या पर्यायाचे वर्तुळ रंगवावे लागणार आहे. मात्र पाचपैकी एकही पर्याय न रंगविल्यास त्या प्रश्नासाठी थेट 25 टक्के गुण वजा केले जाणार आहेत. त्यामुळे उत्तर माहिती नसले तरी पर्याय निवडणे आता अनिवार्य ठरणार आहे.
दरम्यान, आयोगाने उत्तरपत्रिकेबाबत काही कठोर नियमही स्पष्ट केले आहेत. उत्तरपत्रिकेवर स्वाक्षरी न केल्यास, काळ्या बॉलपॉईंट पेनऐवजी इतर पेन वापरल्यास किंवा उत्तरपत्रिकेवर अनावश्यक मजकूर, चिन्हे अथवा इतर कोणतीही माहिती लिहिल्यास ती उत्तरपत्रिका थेट अवैध ठरवली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षेदरम्यान उत्तरपत्रिका भरताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.







