Education News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये यंदा एक महत्त्वाचा आणि वेगळा शैक्षणिक प्रयोग राबवला जाणार आहे. नेहमीप्रमाणे जूनऐवजी यंदा इयत्ता पहिलीचे वर्ग थेट मार्च महिन्यातच सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे 2000 हून अधिक जिल्हा परिषद शाळांमधील पहिलीची मुले शाळेच्या वातावरणाशी लवकर परिचित होणार आहेत.

या उपक्रमामागची पार्श्वभूमी लक्षात घेतली, तर दरवर्षी जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर पहिलीच्या वर्गातील अनेक मुलांना शाळेत रुळायला वेळ लागतो. नवीन वातावरण, शिक्षक, वर्गात बसण्याची शिस्त आणि अभ्यास यामुळे अनेक मुले रडतात, घाबरतात किंवा काही दिवस शाळेला गैरहजर राहतात. याचा थेट परिणाम उपस्थितीवर आणि शिकण्याच्या गतीवर होतो. ही अडचण लक्षात घेऊन शिक्षण विभागाने “आनंददायी शिक्षण” या संकल्पनेतून हा निर्णय घेतला आहे.
याअंतर्गत 9 March ते 30 April या कालावधीत इयत्ता पहिलीसाठी पूर्वतयारीचे वर्ग घेतले जाणार आहेत. हे वर्ग औपचारिक अभ्यासापेक्षा मुलांना शाळेची ओळख करून देणारे असतील. खेळ, गाणी, गोष्टी, चित्रकला, संवाद आणि गट उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना शाळेत बसण्याची सवय लावली जाणार आहे. त्यामुळे जूनमध्ये नियमित शैक्षणिक वर्ष सुरू झाले, तेव्हा मुलांना भीती न वाटता ते आत्मविश्वासाने वर्गात सहभागी होतील, असा शिक्षण विभागाचा विश्वास आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 2090 शाळा असून त्यामध्ये सध्या पहिली ते दहावीपर्यंत सुमारे 220000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी इयत्ता पहिलीत साधारण 16000 ते 17000 नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश होतात. याच विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
यापूर्वी शिक्षण विभागाकडून एप्रिल किंवा जून महिन्यात पालक-विद्यार्थी मेळावे, प्रवेशोत्सव, स्वागत समारंभ असे उपक्रम घेतले जात होते. बैलगाडी मिरवणूक, फुले, खाऊ देऊन मुलांचे स्वागत केले जात असले, तरी प्रत्यक्ष वर्गात बसण्याची सवय लागण्यासाठी वेळ जात होता. मार्च-एप्रिलमध्येच वर्ग सुरू केल्यामुळे ही दरी भरून निघेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे उपस्थितीचे प्रमाण वाढणे. सुरुवातीच्या महिन्यांत होणारी गैरहजेरी कमी होईल आणि शिक्षकांनाही प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ओळखण्यास वेळ मिळेल. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून प्रवेशपात्र मुलांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असून शिक्षकांना यासाठी विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या मते, “लहान मुलांना शाळेत बसण्याची सवय लागावी, शाळेबद्दल सकारात्मक भावना निर्माण व्हावी, यासाठी हा निर्णय घेतला आहे.” एकूणच, हा उपक्रम यशस्वी ठरल्यास प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेत आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.







