Sangali news : दिल्लीत शिक्षणासाठी आलेल्या दहावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. शौर्य प्रदीप पाटील असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत तो दहावीत शिकत होता. या विद्यार्थ्याने शाळेतील सततच्या छळाला कंटाळून मंगळवारी मेट्रो स्टेशनवरून उडी मारत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि काही शिक्षकांकडून होणाऱ्या त्रासामुळे शौर्य मानसिक तणावाखाली असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून शौर्यची सुसाईड नोटही पोलिसांना मिळाली आहे. Sangali news

शौर्य पाटील हा मूळचा सांगलीचा
शौर्य पाटील हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावचा. कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त दिल्लीतील राजीव नगर भागात राहतात. घटना घडलेल्या दिवशी शौर्यचे वडील प्रदीप पाटील हे कोल्हापूरला आजीच्या उपचारांसाठी गेले होते. सकाळी मुलाला नेहमीप्रमाणे ड्रायव्हर शाळेत सोडून आला, मात्र दुपारी तो परतला नाही. याचदरम्यान त्याच्या मित्राने घरच्यांना फोन करून सांगितले की, शौर्य मेट्रो स्टेशनकडे गेला आहे. थोड्याच वेळात आलेल्या फोनवरून कुटुंबाला धक्का बसला शौर्य पुलावरून पडल्याची माहिती देत त्याला रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. Sangali news
शिक्षकांच्या धमक्या
हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर पोलिसांनी कुटुंबाला कळवले की, शौर्यजवळ सुसाईड नोट सापडली आहे. तेव्हा ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले. शौर्यच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, गेल्या सात–आठ महिन्यांपासून तो शिक्षकांच्या त्रासाबद्दल तक्रार करत होता. चारच दिवसांपूर्वी एका शिक्षकाने त्याला “दाखला काढून हातात देईल” अशी धमकीही दिली होती. आत्महत्येच्या दिवशी शाळेतील एका कार्यक्रमात पाय घसरून पडल्यावर शिक्षकांनी त्याला मुद्दाम पडलो असा आरोप करून सर्वांसमोर अपमानित केले. ‘तुझा ड्रामा बंद कर’ अशी ताशेरेबाजीही करण्यात आली. मुख्याध्यापिकांपुढेच हा अपमान झाला, तरी त्यांनीही कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.
सुसाईड नोट मिळाली
शौर्यने सुसाईड नोटमध्ये इतर विद्यार्थ्यांवर असा छळ होऊ नये, हीच माझी शेवटची इच्छा असल्याचे लिहिले आहे. हा अंतर्मुख करणारा संदेश आता अनेक प्रश्न निर्माण करतो. शौर्यचे वडील आणि नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “आमचा मुलगा गमावला; पण दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर हा काळा दिवस येऊ नये,” अशी शोकांतिका शौर्यच्या काकांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणामुळे शाळांमधील विद्यार्थी-शिक्षक वर्तन, मानसिक आरोग्य आणि प्रशासकीय जबाबदारी यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कुटुंबीयांनी न्यायाची मागणी करत कारवाई होईपर्यंत न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.







