लोणी काळभोर, ता. १० : तडीपार असलेल्या युवराज गणेश भिसे याच्यावर लोणी काळभोर येथील महादेव मंदिराच्या पाठीमागील शेडमध्ये जुन्या वादातून चौघांनी मारहाण केल्याची तक्रार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. यावेळी कार्तिक जाधव याने दगडाने डोक्यात मारल्याने दुखापत झाल्याचा आरोप भिसे याने केला आहे. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या त्याच्या मित्रालाही ठोसे-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

युवराज गणेश भिसे (वय २१, व्यवसाय रिक्षाचालक, रा. लोणी काळभोर) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार्तिक अनिल जाधव, प्रज्वल संदीप शिंदे, नरेश ससाणे आणि दादा पाखरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी युवराज भिसे हा आईसोबत राहतो. वडिलांचे सुमारे १५ वर्षांपूर्वी निधन झाले असून, रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. गेल्या तीन महिन्यांपूर्वी त्याला तडीपार करण्यात आल्याने तो नांदेड येथे मित्राकडे राहत होता आणि तेथे फरशी बसविण्याचे काम करीत होता.

७ ऑगस्ट रोजी त्याच्या आईने प्रकृती ठीक नसल्याचे सांगून भेटण्यासाठी घरी येण्यास फोन केला. त्यानंतर तो प्रवास करून पुण्यात आला. पुढे त्याचे मामा कृष्णा म्हात्रे यांनी महादेव मंदिराच्या पाठीमागील शेडमध्ये ‘आखाड पार्टी’ असल्याचे सांगितले. त्यानुसार ९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास भिसे हा शेडमध्ये जेवण बनविण्यासाठी गेला होता. तेथे मामा आणि त्यांचे मित्र जेवण तयार करीत होते. त्यावेळी कार्तिक अनिल जाधव, प्रज्वल संदीप शिंदे, नरेश ससाणे आणि दादा पाखरे हे चौघे तेथे आले.

जुन्या वादाचा राग; ठोसे-बुक्क्यांनी मारहाण
चौघांनी जुन्या वादाचा राग मनात धरून त्याला ठोसे-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कार्तिक जाधव याने तेथे पडलेला दगड उचलून भिसेच्या डोक्यात मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वेळी भांडण सोडविण्यासाठी त्याचा मित्र बाळा भांड पुढे आला असता, त्यालाही चौघांनी ठोसे-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत भिसे याने म्हटले आहे.
दरम्यान, भिसे याने आपण तडीपार असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे तो लोणी काळभोरमध्ये कोणत्या कारणाने आला आणि त्याला तडीपार आदेशाच्या कालावधीत प्रवेशाची कोणती परवानगी होती का, याबाबतही पोलिसांकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे लोणी परिसरात पुन्हा एकदा जुन्या वादातून होणाऱ्या मारामारीचा मुद्दा चर्चेत आला असून, या हल्ल्यामागील नेमके कारण काय होते आणि चौघांमध्ये पूर्वी कोणता वाद झाला होता, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. भिसे याच्या तक्रारीवरून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.






