iran israel war : अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत तणाव तीव्र झाला असून त्याचे पडसाद आता नागरी हवाई वाहतुकीवर उमटू लागले आहेत. आखाती देशांतील हवाई क्षेत्र काही काळासाठी बंद किंवा मर्यादित करण्यात आल्याने अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली. त्याचा थेट परिणाम Dubai International Airport येथील उड्डाणांवर झाला असून भारताकडे येणारी आणि येथून जाणारी अनेक विमाने थांबवण्यात आली आहेत. परिणामी, मोठ्या संख्येने भारतीय प्रवासी दुबईत अडकले आहेत.

यामध्ये पुण्यातील एका व्यवस्थापन महाविद्यालयाच्या 80 एमबीए विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. शैक्षणिक सहलीसाठी हे विद्यार्थी दुबईला गेले होते आणि 1 मार्च रोजी भारतात परतण्याचे नियोजन होते. मात्र, उड्डाणे अचानक रद्द झाल्याने त्यांना दुबईतच थांबावे लागले. विद्यार्थी सध्या सुरक्षित असल्याची माहिती मिळत असली, तरी त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हिंगोली येथील खुशी बढेरा ही विद्यार्थिनीही या गटात आहे. तिच्या वडिलांनी केंद्र सरकारकडे विशेष हस्तक्षेपाची मागणी केली आहे. युक्रेन युद्धकाळात जशी विशेष मोहीम राबवून विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली, त्याच धर्तीवर या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणावे, अशी त्यांची विनंती आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील उत्कर्ष मपारा हाही दुबईत अडकला आहे. ग्लोबल एमबीएच्या 6 महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी तो 18 फेब्रुवारी रोजी दुबईत दाखल झाला होता. तो स्वतंत्रपणे राहत असून कुटुंबीयांशी सातत्याने संपर्कात आहे. “तो सुरक्षित आहे, पण पालक म्हणून काळजी वाटते,” असे त्याचे वडील राजेश मपारा यांनी सांगितले.
सध्याची परिस्थिती विद्यार्थ्यांसह पर्यटन किंवा नोकरीसाठी परदेशात गेलेल्या भारतीयांसाठी अनिश्चिततेची ठरत आहे. हवाई मार्ग सुरळीत होईपर्यंत प्रवाशांना अतिरिक्त निवास आणि खर्चाचा सामना करावा लागू शकतो. तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत भारतीय दूतावासाशी संपर्क ठेवणे, अधिकृत प्रवास सल्ल्यांवर लक्ष ठेवणे आणि विमान कंपन्यांच्या अद्ययावत सूचनांची माहिती घेणे आवश्यक आहे.
मध्य पूर्वेतील तणाव किती काळ टिकणार, याबाबत स्पष्टता नसली तरी या घटनांनी परदेशात शिक्षण आणि रोजगारासाठी गेलेल्या तरुणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. सरकारने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी पालकांकडून होत आहे.







