Hadapsar News लोणी काळभोर, ता. 28 : क्रेडिट कार्डच्या थकबाकी वसुलीच्या वादातून एजंटांकडून थेट रस्त्यावर गुंडगिरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पंधरा नंबर चौकात तीन वसुली एजंटांनी एका नागरिकाला अडवून शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (ता. 27) दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हडपसर पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्न उपस्थित झाले आहेत. Hadapsar News

संदीप जामदार असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जय कासार, विनीत कासार आणि तनिष खुडे या तिघांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी क्रेडिट कार्ड कंपनीचे हे तिघे वसुली एजंट थकबाकी वसूल करण्यासाठी जामदार यांना पंधरा नंबर चौकात अडवले. यावेळी वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर थेट मारहाणीत झाले. Hadapsar News
संबंधित एजंटांनी जामदार यांना भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी त्यांच्यासोबत असलेली महिला हात जोडून “मारहाण करू नका” अशी विनंती करत होती; मात्र एजंटांनी तिचीही पर्वा न करता शिवीगाळ करत मारहाण सुरूच ठेवली. दुपारच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. काही नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एवढा गंभीर प्रकार घडूनही हडपसर पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यामुळे “भररस्त्यात मारहाण करूनही फक्त अदखलपात्र गुन्हा?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. या कारवाईमुळे एजंटांना पोलिसांकडून एकप्रकारे मोकळीक मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, भविष्यात अशा घटनांत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. Hadapsar News
या घटनेदरम्यान एजंटांकडून “चला पोलीस ठाण्यात, दाखवतो” अशा धमक्या दिल्याचाही आरोप समोर आला आहे. त्यामुळे पोलिस आणि वसुली एजंट यांच्यात संगनमत तर नाही ना, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.भरदिवसा घडलेल्या या घटनेने कायदा व सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे केले असून, “गुंडगिरीला पाठीशी घालणारे कोण?” हा सवाल आता अधिक तीव्र झाला आहे. Hadapsar News
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग, मारहाण व धमकी यांसारख्या गंभीर बाबी असतानाही भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. Hadapsar News







