बुलडाणा, ता. 23 : जिल्ह्यात सध्या लग्न जुळत नाही म्हणून तरुणांमध्ये नैराश्य वाढत आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही लग्न जुळत नसल्यामुळे आता तरुणांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. बुलढाणा जिल्हय़ात लग्न जमत नसल्यामुळे पाच दिवसांत दोन तरुणांनी मृत्यूला कवटाळले. पहिली आत्महत्या चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे, तर दुसरी आत्महत्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे झाली.

संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील 28 वर्षीय हरीश वानखेडे याने राहत्या घरात गळफास घेतला. हरीशचे कुटुंब अत्यंत गरीब असून ते भूमिहीन होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्याचे वडील त्याच्यासाठी मुलीचे स्थळ पाहत होते. मात्र, स्वतःची शेती नसणे आणि हलाखीची आर्थिक परिस्थिती यामुळे त्याला कोणीही मुलगी द्यायला तयार नव्हते. या सततच्या नकारामुळे आलेल्या नैराश्यातून हरीशने घरात कोणीही नसताना आपली जीवनयात्रा संपवली.
दुसरी घटना अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगरूळ येथे घडली. 25 वर्षीय सत्यपाल भिसे याने झाडाला फाशी घेतली. सत्यपालचे शिक्षण भरपूर झाले होते, मात्र त्याला नोकरी मिळत नव्हती. सोबतच्या मित्रांची लग्ने झाली, मात्र त्याचे लग्न जुळत नव्हते. या दुहेरी नैराश्यातून सत्यपालला दारूचे व्यसन लागले होते. अखेर मानसिक तणाव असह्य झाल्याने त्याने फाशी घेऊन आपले आयुष्य संपवले.
दरम्यान, या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या घटनांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एक भीषण वास्तव समोर आणले आहे. शेतीतील अनिश्चितता, बेरोजगारी आणि मुलींच्या बदललेल्या अपेक्षांमुळे मुलांची लग्ने न होण्याचे प्रमाण वाढले असून, त्यातून तरुण नैराश्याकडे ओढले जात आहेत.







