Big News धुळे, ता. 17 : राज्यात भोंदूबाबांच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच धुळे जिल्ह्यातून अंधश्रद्धेला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. साक्री तालुक्यातील जैताणे परिसरात स्वतःला आध्यात्मिक शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या एका भोंदूबाबाच्या आश्रमात शनी अमावस्येच्या रात्री गेलेल्या तरुण आणि तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत खून झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. Big News

या प्रकरणात जयश्री रजनीकांत काकुस्ते (वय २५) आणि अक्षय गंगाधर सोनवणे या मित्र-मैत्रिणींचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी योगेश ऊर्फ भय्या बापू खैरनार या भोंदूबाबाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात पूजाविधीनंतर झालेल्या वादातून ही दुहेरी हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Big News

रस्त्याच्या कडेला सापडला तरुणीचा मृतदेह
शनिवारी सकाळी रायपूर-भडगाव मार्गावर एका तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. मृतदेहाचे तोंड रुमालाने बांधलेले होते, तर तिच्यावर दुचाकी टाकण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान मृत तरुणीची ओळख जयश्री काकुस्ते अशी पटली. जयश्रीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ती आणि तिचा मित्र अक्षय सोनवणे हे दोघे शनी अमावस्येनिमित्त विशेष पूजेसाठी योगेश खैरनार यांच्या आश्रमात गेले होते. मात्र त्यानंतर दोघांचाही संपर्क तुटला होता.
पूजेनंतर वाद, आणि रक्तरंजित शेवट
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आश्रमात पूजाविधी सुरू असताना काही कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट हत्याकांडात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपी भोंदूबाबाने अक्षयच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने वार करून त्याचा खून केला, तर जयश्रीचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. Big News
‘त्या’ केशरी रुमालाने उलगडले रहस्य
घटनास्थळी पोलिसांना एक केशरी रंगाचा रुमाल आढळून आला होता. हाच रुमाल तपासातील महत्त्वाचा दुवा ठरला. श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला असता, श्वानाने थेट योगेश खैरनारच्या आश्रमाचा मार्ग दाखवला. त्यानंतर पोलिसांनी संशयित भोंदूबाबाला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. सुरुवातीला आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. “मी एका तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो,” असा दावा त्याने केला. मात्र पोलिसांच्या कसून चौकशीनंतर त्याचा बनाव उघड झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. Big News
मृतदेह पुरण्यासाठी बैलगाडीचा वापर?
अक्षय सोनवणेचा मृतदेह आश्रमाजवळील वनक्षेत्रात पुरण्यात आल्याचे आरोपीने कबूल केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेह नेण्यासाठी बैलगाडीचा वापर करण्यात आल्याचेही समोर आले आहे. पोलिसांना घटनास्थळी बैलगाडीच्या चाकांचे ठसेही आढळून आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी जंगल परिसरातून अक्षयचा मृतदेह ताब्यात घेतला.
नरबळीचा संशय? पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हा प्रकार अंधश्रद्धा, गुप्त पूजा किंवा नरबळीशी संबंधित आहे का, याचीही चर्चा रंगली आहे. मात्र पोलिसांनी प्राथमिक तपासात नरबळीचा कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. निजामपूर पोलिसांनी आरोपीविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद केली असून, या हत्याकांडात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. या घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून, भोंदूबाबांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.






