Bhor News पुणे, ता. 17 : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या नसरापूर येथील चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई करत न्यायालयात तब्बल ११०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात ५० हून अधिक साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरण, डीएनए चाचणी अहवाल, वैद्यकीय तसेच न्यायवैद्यकीय पुरावे जोडण्यात आले आहेत. Bhor News
या अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. पोलिस अधीक्षकांसह सहा अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने विविध तांत्रिक आणि वैज्ञानिक पुरावे गोळा करून अल्पावधीत तपास पूर्ण केला. या प्रकरणात विशेष सरकारी वकील अजय मीसार हे सरकार पक्षाची बाजू मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. Bhor News
राज्यभर संतापाची लाट
नसरापूर येथे घडलेल्या या अमानुष घटनेनंतर संपूर्ण राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला होता. विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आंदोलन आणि मोर्चे काढले होते. “आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी,” अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून होत होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पंधरा दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काल रात्री उशिरा न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले. Bhor News
नेमकं काय घडलं होतं?
१ मे रोजी नसरापूर येथे घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. घरासमोर खेळत असलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला आरोपीने “वासरू दाखवतो” असे सांगत गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवण्यात आला होता. दुपारी मुलगी दिसेनाशी झाल्यानंतर कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर गोठ्यात तिचा मृतदेह आढळून आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी चिमुरडीला गोठ्याकडे घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले आणि या भीषण घटनेचा उलगडा झाला. Bhor News
न्यायालयातही धक्कादायक वर्तन
या प्रकरणात ग्रामस्थांनी संतप्त होत आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र इतके गंभीर कृत्य करूनही आरोपीने पश्चाताप व्यक्त न केल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी “तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल आहे, माहिती आहे का?” असा प्रश्न विचारला असता, आरोपीने “ही मारामारीची किरकोळ केस आहे,” असे उत्तर दिल्याचे सांगितले जात आहे. या उत्तरामुळे न्यायालय परिसरातही संतापाची भावना व्यक्त करण्यात आली. Bhor News
यापूर्वीही गंभीर आरोप
तपासादरम्यान आरोपीवर यापूर्वीही अशाच प्रकारचे गंभीर आरोप झाल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र पुराव्याअभावी तो दोन वेळा निर्दोष सुटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात तरी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रामुळे आता न्यायालयीन प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे.







