लोणी काळभोर, (पुणे) : पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती हद्दीतील लोणी स्टेशन चौकात कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कवडीपाट येथील दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (ता. २०) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला आहे. अपघात एवढा भीषण होता कि, यामध्ये दोन्ही बहिणींचा जागेवरच चेंदामेंदा झाल्याने मृत्यू झाला होता.
गायत्री नंदकुमार शितोळे (वय-१७) व राजश्री नंदकुमार शितोळे (वय-१०, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी बहिणींची नावे आहेत. विशेष बाब म्हणजे अपघात झाला त्या ठिकाणापासुन अवघ्या हाकेच्या अंतरावर तीनशे बेडचे एक “बडे हॉस्पीटल” तर अर्धा किलोमिटर अंतरावर “लोणी काळभोर पोलिस ठाणे असतांनाही, अपघातानंतर वेळेवर मदत मिळु न शकल्याने दोघींचेही मृतदेह रस्त्यावर चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत पडुन होते.
गायत्री व राजश्री या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरात राहत होत्या. यातील गायत्री हि लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल येथे इयत्ता अकरावित शिक्षण घेत होती. तर राजश्री हि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होती. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मामा पांडुरंग नवनाथ भिक्षे हे दुचाकीवरून गायत्री व राजश्रीला शाळेत सोडायला निघाले होते. त्यांची मोटारसायकल लोणी स्टेशन चौकात आली असता, पुण्याहुन सोलापूरच्या दिशेने निघालेल्या पांढऱ्या रंगाच्या कंटेनरने दुचाकीला पाठीमागुन जोरदार धडक दिली. या धडकेत मामा हे रस्त्याच्या बाजूला उडून पडले. तर गायत्री व राजश्री या रस्त्याच्या मधोमध पडल्या. कटेनरचा वेग जादा असल्याने, कंटेनर गायत्री व राजश्री या दोघी बहिणींच्या अंगावरून गेला. व त्यातच त्यांचा चेंदामेंदा झाल्याने जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर दोन मुलींचा मृत्यूस कारणीभूत ठरलेला कंटेनर लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सदर कंटेनर चालक पळून गेला असून लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान चौकात झालेल्या अपघातात दोन मुलींचा जागेवरच मृत्यु झालेचे दिसताच, चौकातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेल्या घटनेची माहिती देण्यासाठी कांही स्थानिक नागरीकांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र लोणी काळभोर पोलिसांचा फोन बिझी लागत असल्याने, अपघात झाल्यानंतर तब्बल अर्धातासानंतर पोलिस घटनास्थळी पोचले. तर दुसरीकडे अपघातातील भिषनता पाहुन, स्थानिक नागरीकांनी अपघात झालेल्या ठिकाणापासुन केवळ पन्नास मिटर अतरावर असलेल्या विश्वराज हॉस्पीटलमध्ये मदत मागितली. मात्र आमच्याकडे एकही रुग्णवाहिका शिल्लक नसल्याचे कारण सांगत, विश्वराज हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यांनी मदत देण्यास नकार दिला.
तर दुसरीकडे रुग्णविहिका नसेल तर किमाण अपघातात चेंदामेदा झालेल्या मृतदेहावर झाकण्यासाठी कपड्याची मागणी स्थानिक नागरीकांनी विश्वराज हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यांच्याकडे केली. मात्र एवढी गंभीर बाब असतांनाही व अपघात पन्नास मिटरवर झालेला असताना, त्यानंतर तब्बल तासभरानंतर हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यांनी कपडा आनुन दिला. मात्र त्यापुर्वीच स्थानिक कार्यकर्ते सतीश काळभोर यांनी स्वतःच्या घरातुन कपडा आणुन मृतदेह झाकले होते. तर दुसरीकडे मृतदेह हलविण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिका मिळावी यासाठी हडपसरपासुन उरुळी कांचन पर्यंत संपर्क साधला होता. पण पुण्याच्या उपनगरातही सव्वातासाहुन अधिक काळ एकही रुग्णवाहिका मिळु शकली नाही. अखेर सव्वातासानंतर आलेल्या रुग्णवाहिकेतुन अपघातग्रस्त दोन्ही मुलींचे मृतदेह पुढील कारवाईसाठी हलविले.
पुणे-सोलापुर या नामांकित महामार्गा शेजारीच हाकेच्या अंतरावर तीनशे बेडचे नामंकित हॉस्पिटल व लोणी काळभोर पोलीस ठाणे आहे. तरीही ना वाहतूक शाखेचे पोलीस, ना शेजारी असलेले डॉक्टर, व ॲम्बुलन्स घटनास्थळी वेळेत आली नसल्याने तब्बल अर्धा ते पाऊन तास या मुलींना कसलीच मदत मिळालेली नव्हती. त्यामुळे अपघात झालेल्या ठिकाणी दोन्ही मुली तशाच पडून होत्या. यामुळे बडे हॉस्पीटलच्या व्यवस्थापनाबद्दल स्थानिक नागरिकांनी तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हेसाहेब आत्ता तरी लक्ष द्या…!
पुणे-सोलापुर महामार्गावर पंधरा नंबर ते उरुळी कांचन या वीस किलोमिटर अंतराच्या टप्प्यात वहातुक कोंडी व छोटे-मोठे अपघात होणे ही बाब नित्याचीच ठरलेली आहे. लोणी काळभोरसाठी स्वतंत्र चाळीसच्या आसपास वहातुक पोलिस असतांनाही, वहातुक पोलिस पठाणी वसुलीत दंग असल्याने, चौकाचौकात रोजच वहातुकीची कोंडी होत आहे. पंधरा नंबर ते उरुळी कांचन या वीस किलोमिटर अंतराच्या टप्प्यात रोज किमान दोन तरी छोटे-मोठे अपघात होतातच. काल (शुक्रवारी) एमआयटी कॉर्नरला झालेल्या अपघातात अथर्व साळंखे या सतरा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झालेला आहे. त्याच्यावर उपचार चालु असतानाच, आज सकाळी वरील दोन मुलींना जीव गमवावा लागलेला आहे. चौका-चौकात पांढरे पट्टे मारल्यास व वहातुक पोलिस उभे राहिल्यास नक्कीच अपघात कमी होतील. मात्र खासदार, आमदार व सर्वच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते चमकोगिरी करण्यात दंग असल्याने, पंधरा नंबर ते उरुळी कांचन या वीस किलोमिटर अंतराच्या टप्प्यात अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे “खासदार ” साहेब आत्ता तरी या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लोकप्रतिनीधी या नात्याने लक्ष द्या एवढीच नागरीकांची आपल्याकडे हात जोडुन विनंती आहे.