दिनेश सोनवणे
दौंड : दौंड येथील बहुचर्चित ॲट्रॉसिटी व मारहाण प्रकरणात फरार असलेल्या माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याचा अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज बारामतीच्या सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे बादशहा शेखच्या अडचणी वाढल्या असून पोलिसांनाही त्याचा ठावठिकाणा शोधला असल्याने अटक किंवा शरण हे दोनच पर्याय शिल्लक आहेत.
दौंड शहरात कुंभार गल्लीत हा प्रकार घडला होता. या प्रकरणी महिलेने बादशहा शेख याच्यासह २० जणांविरोधात ॲट्रॉसिटी, जीवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग असे गुन्हे पोलिसांनी दाखल केले होते. या प्रकरणात बादशहा शेख याला अटक करावी यासाठी भाजपने अगदी रत्नागिरीतून आमदार नितेश राणे यांना मोर्चासाठी बोलावून घेतले. त्यामुळे या प्रकाराची चर्चा राज्यभर झाली.
फरार बादशहा शेखला ४८ तासांत त्याला अटक करा अशी मागणी राणे यांनी केली होती. मात्र या २० आरोपीपैकी केवळ ४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राणेंच्या अल्टिमेटम नंतर तातडीने तत्कालीन पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने, राजकारणात पोलीस अधिकाऱ्याचा बळी गेला, अशी चर्चा रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर, फरार बादशहा शेख याने बारामतीच्या सत्र न्यायालयात धाव घेतली. उर्वरित तपासासाठी पोलिस कोठडी आवश्यक असून गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे, तसेच आरोपी हा राजकीय मोठा पदाधिकारी असून त्याने खरेतर हा गुन्हा घडू न देण्याची त्याची जबाबदारी होती, तसे न करता उलट हा वाद जिवावर बेतेल असे कृत्य केले. त्यामुळे पदाचा गैरवापर करणाऱ्या आरोपीस अटकपूर्व जामीन देऊ नये असा युक्तिवाद केला, सरकार पक्षाच्या विशेष सरकारी वकील अॅड. प्रसन्न जोशी यांनी केला.
बचाव पक्षाने देखील आरोपीचा अपघात झाला असून पायाला जखमा झाल्याने तो गुन्हा करू शकत नाही, असा युक्तिवाद मांडला. यावेळी पीडित देखील उपस्थित असल्याने पीडितेने प्रतिज्ञापत्र दाखल करून आरोपीला जामीन मिळाल्यास जीविताला धोका असल्याचे स्पष्ट केले. उपविभागीय अधिकारी राहूल धस यांनीही आरोपीला अटकपूर्व जामीन देऊ नये यासाठी जोरदार म्हणणे मांडले. दरम्यान सर्व बाजूचा युक्तीवाद ऐकून जिल्हा न्यायाधीश आर. के. देशपांडे यांनी बादशहा शेख याचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज नामंजूर केला.