पुणे: पुणे शहर, जिल्हा आणि घाटमाथ्यावर शनिवारी दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच आकाश ढगांनी भरून गेले होते. त्यामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. अधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. शहरातील अनेक भागांत वाहतूक संथ झाली, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटनाही घडल्या.

शुक्रवारी मध्यरात्री सुरू झालेला पाऊस शनिवारीही कायम होता. सकाळी आणि दुपारच्या सुमारास काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. शहरात सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत १४.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सलग चार दिवस पाऊस होत असल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीही ही परिस्थिती दिलासादायक मानली जात आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरणी आणि इतर शेतीच्या कामांना वेग मिळाला असून, ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून पुण्यासह राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस होत आहे. हवामान विभागाने ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
रविवारी पुणे शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पुणे-सातारा घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वर्षासहलीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक आणि विदर्भातील अनेक भागांतही शनिवारी मुसळधार पाऊस झाला. राज्यातील काही भागांमध्ये जनजीवनावर त्याचा परिणाम झाला असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.






