पुणे: गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाने उघडीप दिल्याने अनेक पूरग्रस्त भागांतून पाणी ओसरले असून, जनजीवन आता हळूहळू सामान्य होत आहे. मात्र, अशातच सोशल मीडियावर आगामी 15 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या, ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

या व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्यांवर भारतीय हवामान विभागाने (IMD) अखेर स्पष्टीकरण दिले आहे. हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी सोशल मीडियावरून नागरिकांचा गोंधळ दूर केला आहे. पुढील 2 आठवड्यांत संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार असल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आणि आधारहीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही अफवांना बळी न पडता, केवळ हवामान खात्याच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, 13 ते 20 जुलै या कालावधीत कोकण विभागाला वगळता महाराष्ट्रातील इतर भागांत पावसाचे प्रमाण खूपच कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान तीव्र राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या विशिष्ट भागांतील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणार असल्याने दिलासा मिळणार आहे.







