पुणे: महाराष्ट्रात यंदा मान्सूनचे आगमन लांबल्याने पावसाची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. जून महिना संपत आला तरी अनेक भागांत पावसाचा पत्ता नसल्याने पेरण्या खोळंबल्या असून, बळीराजा चिंतेत आहे. राज्यात उष्णतेचा चटका आणि उकाडा अद्याप कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी विदर्भातील 9 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

विभागीय हवामान स्थिती:

-
विदर्भ: अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत उष्णतेची लाट असेल. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत उष्णतेसोबतच 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहून वादळी पावसाचा अंदाज आहे.
-
कोकण आणि मुंबई: मुंबई, पालघर, ठाणे आणि रत्नागिरीत दमट हवामानामुळे उकाडा वाढला आहे. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे, तिथे तुरळक पावसाची शक्यता आहे.
-
पश्चिम महाराष्ट्र: कोल्हापूरच्या घाट परिसरात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहून मध्यम पावसाची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. सातारा आणि सांगलीत हलक्या सरींची, तर सोलापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
-
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा: धुळे, नंदुरबार आणि नाशिकमध्ये हवामान कोरडे राहील. मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये हलका पाऊस पडू शकतो, मात्र छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना आणि बीडमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या उष्णतेचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याने, हवामान विभागाने नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्र आता मान्सून सक्रिय होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.








