हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सातारा, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भातील परिस्थिती मात्र वेगळी असून, तेथे पावसाचा जोर कमी राहणार आहे. विदर्भात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात पावसाने काही काळ उघडीप दिल्याने तापमानाचा पारा ३३ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवला जात असून, उष्णतेचा त्रास वाढला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या पावसाला पोषक वातावरण तयार होत असून २० जुलैपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि हवामानातील बदलांबाबत सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







