बीड: मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित आणखी एक गंभीर बाब समोर आली असून कृष्णा आंधळेच्या गावातील काही नागरिकांनी धमक्या आणि दहशतीबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील मैंदवाडी गावातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत निवेदन सादर केले. गावकऱ्यांचा आरोप आहे की, काही जणांकडून गावात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
तक्रारीनुसार, “कृष्णा आंधळे जोपर्यंत बाहेर आहे, तोपर्यंत आम्ही तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही,” अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
गावकऱ्यांनी काही व्यक्ती कृष्णा आंधळेच्या संपर्कात असल्याचाही संशय व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणातील संबंधित व्यक्तींचे कॉल रेकॉर्ड आणि सीडीआर तपासल्यास अधिक माहिती समोर येऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे.
याशिवाय, गावात मारहाण, धमक्या आणि शांतता भंग होण्याच्या घटना वाढत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, कृष्णा आंधळेचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून या नव्या आरोपांचीही पडताळणी केली जात आहे.






