सातारा: रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या अत्यंत धोकादायक आंबेनळी घाटात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एक स्कॉर्पिओ गाडी थेट ५०० ते ७०० फूट खोल दरीत कोसळली. रविवारच्या मध्यरात्री झालेल्या या भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील ८ तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व तरुण मित्र असून ते परिसरात पर्यटनासाठी आले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे महेश पवार (वय २५), आदित्य साळुंखे (वय २१), रितेश लोखंडे (वय २५), सुहास लोखंडे (वय २०), अंश चव्हाण (वय १८), उत्कर्ष शिंगटे (वय २१), अनिल शिंगटे (वय २५) आणि नितीन नायकोंडे (वय ३५) अशी आहेत. एकाच गावातील ८ तरुण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समजताच संपूर्ण आसगाव परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावाने तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पाहा व्हिडीओ:
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, महाबळेश्वर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि ट्रेकर्सने तातडीने मदतकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. दरी अत्यंत खोल असल्याने आणि रात्रीचा अंधार, दाट धुके यामुळे बचाव पथकाला सुरुवातीला काम करण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. अखेर आज पहाटे दोरखंडाच्या साहाय्याने रेस्क्यू टीम दरीत उतरली आणि त्यांनी अथक परिश्रमानंतर चक्काचूर झालेल्या गाडीतून मृतदेह बाहेर काढले.







