अहिल्यानगर: अहिल्यानगरच्या देहरे गावातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देहरे गावातील एका महिलेला बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्या मुलाला मारण्याची धमकी देत महिलेला पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्वीर शेख, सोहेल शेख आणि अल्फेज शेख अशी आरोपींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, पीडित महिलेची आणि आरोपी तन्वीर शेख यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर तन्वीर शेख हा नेहमी त्या महिलेस संदेश पाठवत होता. मात्र, महिला त्याच्यासोबत केवळ गावातील व्यक्ती म्हणून बोलत होती. मात्र, हे प्रकरण पुढे वाढत गेलं. आरोपी तन्वीर शेखने त्या महिलेला वारंवार संदेश पाठवणं आणि कॉल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संबंधित महिलेने तन्वीर शेख याला यापुढे मला संदेश पाठवू नकोस आणि कॉलही करू नकोस असे सांगितले.

आरोपीने महिलेला धमकी देण्यास सुरुवात केली
दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी तन्वीरने जर माझ्यासोबत बोलली नाहीस तर मी आपले मेसेज आणि फोन कॉल तुझ्या नवऱ्याबरोबरच कुटुंबातील सर्व व्यक्तींना दाखवेन आणि तुझी बदनामी करेल. अशा प्रकारची संबंधित महिलेला धमकी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर संबंधित महिलेला घरातील पैसे आणि दागिने घेऊन येण्यास सांगितले. महिलेचे अपहरण करून त्याने तिच्यावर अत्याचार केला.

आमदार संग्राम जगताप म्हणाले…
दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर गावात एकच संतापाची लाट उसळली आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. जे मुस्लीम समाजाचे लोक गावात राहत आहेत त्यांच्या माध्यमातून परप्रांतीय मुस्लीम लोक गावात येऊन अतिक्रमण करतात, त्यांनी या भागात घर आणि व्यवसाय उभारले आहेत. याच लोकांनी गावातील महिलेसोबत हा प्रकार घडून आणला आहे. आता यांच्या अतिक्रमित घरांवर आणि व्यवसायावर प्रशासनाने बुलडोजर चालवावा, अन्यथा मंगळवारी हिंदुत्ववादी संघटना हे अतिक्रमण काढतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे.







