मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सरकारने हिरावून घेऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. आझाद मैदानावरच आमरण उपोषण करण्याचा निर्धारही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

कायद्याच्या चौकटीत राहून उपोषणासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेचे नियम सरकारनेही पाळले पाहिजेत, असे जरांगे पाटील म्हणाले. सरकार न्यायदेवतेपेक्षा स्वतःला मोठे समजत असून मनमानी पद्धतीने निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारकडून कायदा आणि संविधानाचे उल्लंघन होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

मुंबईत आंदोलनादरम्यान कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, मात्र सरकारनेच आंदोलकांसाठी अडथळा ठरू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सरकारकडून अन्याय झाल्यास सामान्य नागरिकांसाठी न्यायालय हा आधार असल्याचे सांगत, सरकारने न्याय दिला नाही तर न्यायमंदिरातून न्याय मिळेल, असेही जरांगे पाटील म्हणाले.

आझाद मैदानावर शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने आमरण उपोषण करण्यासाठी आपण अर्ज केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकार गणेशोत्सव मानत असेल तर त्यांनी आंदोलकांसाठी विघ्न निर्माण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. लोकशाही आणि कायद्यावर विश्वास असेल तर शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार सरकारने मान्य करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, पुढील आंदोलनाबाबत निर्णय घेण्यासाठी उद्या दुपारी १२ वाजता अंतरवाली सराटी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील विविध भागांतील मराठा बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. मुंबईकडे कधी आणि कोणत्या पद्धतीने जायचे, तसेच पुढील आंदोलनाची दिशा काय असेल, याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
सर्व नियमांचे पालन करण्याची तयारी असल्याचे सांगत सरकारने आडमुठी भूमिका घेतल्यास काय करायचे, असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे अंतरवाली सराटीतील उद्याच्या बैठकीकडे आणि त्यानंतरच्या आंदोलनाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.






