Jinti News जिंती, ता. 12 : “कुणाचाही तंटा असुद्या, जागच्या जागीच मिटवायचा; नागरिकांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागू नये, असा विचार बॉबीराजांनी समाजात रुजवला. स्वाभिमान काय असतो, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. वाघासारखे जगण्यासाठी शिकवलेले त्यांचे विचार आजही जिवंत आहेत,” असे प्रतिपादन प्रा. नानासाहेब पवार यांनी केले.

Jinti News :जिंती (ता. करमाळा) येथे गुरुवारी (ता. 12) बॉबीराजे भोसले यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रा. पवार प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीनराजे भोसले होते. यावेळी मधुकर जगताप, अनिल शेजाळ, बाबू आंबघरे, काशिनाथ गिरंजे, संतोष वारगड, सुरेश झांजुर्णे, सुरेश गुंजाळ, महादेव गिरंजे, सरपंच भागडे पाटील, आजीनाथ मुटके, संतोष गुळवे, सागर गोडसे, बापू शेंडगे यांच्यासह परिसरातील मान्यवर, ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीस बॉबीराजे भोसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना प्रा. पवार म्हणाले, “बॉबीराजे भोसले यांनी समाजात अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण केली. आत्मसन्मान, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचा वारसा त्यांनी पुढील पिढीला दिला. त्यांच्या विचारांमुळेच आज अनेक युवक सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहेत.”Jinti News :
दरम्यान, बॉबीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. एस. यु. राजेभोसले हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच न्यू साई समर्थ पब्लिक स्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांना वही, पेन, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
शेवटी सर्व उपस्थितांनी बॉबीराजे भोसले यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमामुळे जिंती परिसरात सामाजिक ऐक्य आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.







