सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील तरटगाव येथील 27 वर्षीय तरुणाचा प्रेमप्रकरणातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अरविंद बाळू मस्के असे मृत तरुणाचे नाव आहे. सोशल मीडियावरून तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील 42 वर्षीय महिलेशी त्याची ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाल्याचे सांगितले जात आहे.

अरविंद हा ट्रॅक्टर चालक होता आणि आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. गेल्या काही महिन्यांपासून तो संबंधित महिलेशी फोनवरून संपर्कात होता. एप्रिलमध्ये महिला अरविंदच्या घरी आली होती. त्यावेळी ती दोन दिवस तेथे राहिली. त्यानंतर ती पुन्हा तरटगावला आली आणि अरविंदसोबत लग्न करण्याचा आग्रह धरल्याचे समोर आले आहे.

महिलेचा पती तिला घेण्यासाठी आला असता तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. तसेच तिने स्वतःचे काही बरेवाईट करून घेण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे महिलेचा पती तेथून परत गेला.

यानंतर काही दिवसांनी महिलेचा पती, मुलगा आणि अन्य व्यक्ती तरटगावला आले. मात्र, त्यावेळी महिला घरी नव्हती. 13 ऑगस्ट रोजी अरविंद घरी आल्यानंतर त्याला संबंधित महिलेने भेटण्यासाठी बोलावल्याचे त्याने आईला सांगितले. 15 ऑगस्ट रोजी तो महिलेला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडला.
आरोपानुसार, त्यानंतर महिलेचा पती, मुलगा आणि त्यांच्या साथीदारांनी अरविंदला पकडून माळुंब्रा येथे नेले. तेथे त्याला झाडाला बांधून लाकूड, वायर आणि हाताने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात अरविंद गंभीर जखमी झाला.
यानंतर संशयितांनी त्याला तामलवाडी पोलीस ठाण्यात नेले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने पोलिसांनी उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच 22 ऑगस्ट रोजी अरविंदचा मृत्यू झाला.
या प्रकरणी अरविंदच्या आईने तामलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपअधीक्षक मनोहर पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.








