Crime News: यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) जिल्हा येथील घाटंजी परिसरात लग्नाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लग्न ठरवण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळणाऱ्या एका महिलेसह तिचे कुटुंबीय आणि साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हा येथील नांदगाव तालुक्यातील शेतकरी अविनाश कवडे यांना लग्न जमवण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून संपर्क करण्यात आला होता. मध्यस्थामार्फत घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील सिमरन पाटील हिचा प्रस्ताव देण्यात आला. मुलीच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगत लग्नाचा सर्व खर्च मुलाच्या बाजूने करावा अशी अट घालण्यात आली.
कांदे पोह्यांचा कार्यक्रम अन् लुटेरी दुल्हनचा पर्दाफाश
10 फेब्रुवारी 2026 रोजी कवडे कुटुंबीय चोरंबा येथे भेटीसाठी गेले. प्रत्यक्ष भेटीत लग्न निश्चित होण्याआधीच आरोपींनी पैशांची मागणी केली. सुरुवातीला नकार दिल्यानंतरही दबाव वाढवून दोन लाख 50 हजार रुपये घेतले. यातील काही रक्कम आरोपींच्या साथीदाराकडे तर उर्वरित रक्कम मध्यस्थाकडे देण्यात आली.
पैसे मिळाल्यानंतर सिमरन पाटील, तिची आई आणि भाऊ ‘पोहे आणायला जातो’ असे सांगून स्कुटीवरून पसार झाले. त्यानंतर इतर साथीदारांनीही मोबाईल बंद करून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कवडे यांनी घाटंजी पोलिसांत तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान सिमरन पाटील ही यापूर्वीही गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले आहे. काही महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्याला मारहाण आणि दुचाकी चोरीच्या प्रकरणात ती आणि तिचा भाऊ आरोपी होते. पोलिसांनी सिमरन पाटील, तिची आई आशा पाटील, भाऊ करण पाटील तसेच पुसद येथील सुनील राठोड आणि माणिक पवार यांना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





