पुणे: आजकाल डिजिटल पेमेंटमुळे व्यवहार खूप सोपे झाले आहेत. पण याच सोयीचा फायदा घेत सायबर गुन्हेगारीही वाढली आहे. एक चुकीचा कॉल किंवा लिंक तुमचं बँक खातं रिकामं करू शकते. या पार्श्वभूमीवर RBI ने ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी काही महत्त्वाचे बदल सुचवले आहेत.
RBIने सुचवलेल्या प्रस्तावांमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे 10,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1 तासाचा वेटिंग पीरियड ठेवण्याचा नियम. म्हणजे तुम्ही मोठी रक्कम ट्रान्सफर केल्यावर ती लगेच जमा न होता 1 तासानंतर जमा होईल. या वेळेत फसवणूक लक्षात आल्यास व्यवहार थांबवण्याची संधी मिळणार आहे. कारण देशातील सुमारे 98.5 टक्के डिजिटल फसवणुकीची प्रकरणे 10,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.

याशिवाय ‘किल स्विच’ ही नवीन सुविधा देखील आणली जाणार आहे. मोबाईल हरवला किंवा खाते हॅक झाल्याचा संशय आला तर ग्राहक एका क्लिकवर सर्व डिजिटल व्यवहार बंद करू शकतील. जोपर्यंत बँकेत जाऊन पडताळणी होत नाही, तोपर्यंत कोणताही ऑनलाइन व्यवहार करता येणार नाही.
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठीही विशेष सुरक्षा उपाय सुचवण्यात आले आहेत. 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी अतिरिक्त पडताळणी आवश्यक असेल. यामुळे फोन कॉलद्वारे होणारी फसवणूक कमी होण्यास मदत होईल.
फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘म्युल अकाउंट्स’वरही निर्बंध घालण्यात येणार आहेत. अपूर्ण माहिती असलेल्या खात्यांवर वर्षाला 25 लाख रुपयांची मर्यादा असेल. त्यापेक्षा जास्त व्यवहारासाठी अतिरिक्त पुरावे द्यावे लागतील.
गेल्या काही वर्षांत डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली असली तरी सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. 2021 मध्ये 2.6 लाख असलेली प्रकरणे 2025 पर्यंत 28 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फसवणुकीतून लुटली गेलेली रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
हे सर्व नियम लागू करण्यापूर्वी 8 मेपर्यंत नागरिकांना आपले अभिप्राय देण्याची संधी देण्यात आली आहे. RBIच्या या प्रस्तावांमुळे डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.







