चंद्रपूर : विदर्भातील वाघांचा वाढता वावर आणि मानव-वन्यजीव संघर्षाने आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला वाघाने केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही-पवनपार वनक्षेत्रातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. वाघाने केलेल्या हल्ल्यात तब्बल चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी वाघाच्या हल्ल्यात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

13 महिला जंगलात तेंदुपत्ता तोडण्याच्या कामासाठी गेल्या होत्या. सर्वजणी काम करत असतानाच, मादी वाघाने (टी-१ प्रवर्गातील वाघीण असण्याची शक्यता) अचानक हल्ला केला. वाघाचा हा हल्ला अनपेक्षित आणि भीषण होता.

डोळ्यांसमोर मैत्रिणींना ओढून नेलं!
वाघाने केलेल्या हल्ल्यात चार महिला जागीच ठार झाल्या. सोबत असलेल्या इतर नऊ महिलांनी प्रचंड प्रसंगावधान राखून तिथून जीवाच्या आकांताने पळ काढल्याने त्या थोडक्यात बचावल्या.
या थरारक घटनेत मृत्यू पावलेल्या चारही महिला एकाच वॉर्डातील, एकाच गल्लीतील आणि एकमेकांच्या जवळच्या नातेवाईक असून मृतांची नावे १) कविता दादाजी मोहुर्ले (वय ४५ वर्षे) २) अनिता दादाजी मोहुर्ले (वय ४६ वर्षे) ३) संगीता संतोष चौधरी (वय ४० वर्षे) ४) सुनीता कौशिक मोहुर्ले (वय ३५ वर्षे) अशी आहेत.
चार महिलांचा बळी गेल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी वन विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. “रोज आमची माणसं मरतायत, वन विभाग फक्त पंचनामे करणार का?” असा आक्रमक सवाल करत गावकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना विचारला.
घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी आणि पोलिसांचा मोठा ताफा तातडीने जंगलात दाखल झाला आहे. सध्या गावकऱ्यांना शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.







