नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) मोठी घटना मानली गेलेली माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरची हल्ल्याची घटना अखेर फर्जी ठरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी 19 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या कथित हल्ल्याबाबत नागपूर ग्रामीण पोलिसांनी सखोल तपास केला. फॉरेन्सिक तपासासह विविध पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र या तपासात कोणतेही तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे नागपूर ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात ‘बी फायनल’ रिपोर्ट दाखल केला आहे.

या घटनेबाबत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर 2024 रोजी अनिल देशमुख मुलाच्या प्रचारासाठी गेले होते. नरखेडवरून काटोलकडे परतताना बैलफाटा परिसरात रात्री अंधारात दबा धरून बसलेल्या चार लोकांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली, असा आरोप करण्यात आला होता. या दगडफेकीत देशमुख यांच्या डोक्याला इजा झाली असून त्यांना नागपूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले आणि संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणाला मोठा राजकीय रंग चढला. त्या काळात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात होता. देशमुख यांच्यावर झालेला हल्ला ही राजकीय सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेली कथा होती का? असा प्रश्न तेव्हाच अनेकांनी उपस्थित केला होता. पोलिसांनी मात्र यावर निष्पक्ष तपास सुरू केला. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले, फॉरेन्सिक तपास करण्यात आला. मात्र कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत.

अखेर पोलिसांनी या प्रकरणात ‘बी फायनल’ रिपोर्ट दाखल करून ही घटना खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. निवडणुकीच्या काळात वातावरण पेटवण्यासाठी किंवा राजकीय सहानुभूती निर्माण करण्यासाठी ही घटना दाखवण्यात आली होती का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला आला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर आता स्वतः अनिल देशमुख काय भूमिका घेतात, त्यांचे स्पष्टीकरण काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण एकेकाळी मोठा राजकीय वादळ निर्माण करणारी ही घटना आता पूर्णपणे कोसळल्याचे पोलिसांच्या रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे.







